मुंबई : मुंबईत सोमवारी सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू असून संध्याकाळपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना संध्याकाळी चार वाजता कार्यालय सोडण्याची परवानगी देण्यात आली. या संबंधी आदेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे एरव्ही रात्रीपर्यंत सुरू असलेले मंत्रालयातील कामकाज सोमवारी संध्याकाळी चार वाजेपर्यंतच आटोपल्याचं चित्र दिसून आलं.
दरम्यान,मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतूक सेवा कोलमडलेली आहे. याचा परिणाम मंत्रालयातील कामकाजावर झालेला पाहायला मिळाला. अनेक अधिकारी, कर्मचारी कामावरती पोहोचू शकले नाही आणि जे पोहोचले त्यांना लवकर घरी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मंत्रालयातील रिकाम्या खुर्च्या, टेबल पाहायला मिळत आहे.
मान्सूनचे आगमन झाल्यानंतर त्याचा फटका राज्याची राजधानी मुंबईला बसला.
पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे एकीकडे येथील जीवन विस्कळीत झालेले असतानाच याचा फटका राज्याचा बोजा हाकणाऱ्या मंत्रालयालादेखील बसला. सकाळपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मंत्रालयात केवळ ३० टक्के कर्मचारीच उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे.
मुसळधार पावसामुळे मुंबईतील विविध भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. त्यामुळे ठिकठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. याचा परिणाम लोकल सेवेवरही झाला. त्यात हवामान खात्याने येत्या तीन ते चार तास मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून मंत्रालयात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना दुपारी साडेतीन वाजताच घरी जाण्यास सांगण्यात आले. यामुळे इतरवेळी गजबजलेलं मंत्रालय सामसुम झाल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.