मुंबई महापालिकेने २०२४-२५ मध्ये रस्ते, वाहतूक आणि पूल विभागासाठी एकूण १२ हजार ११० कोटी रुपये ९७ लाख रुपयांची तरतूद केली. यातील पूल कामासाठी ७ हजार ७१० कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला. यातील बहुतांश नवीन कामांसाठी निधी मंजूर केला गेला. २०२५-२६च्या अर्थसंकल्पीय अंदाजात पूल विभागासाठी ८ हजार २३८ कोटी ७३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन पुलांसह अस्तित्वात असलेल्या पुलांच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. यामध्ये मुंबई शहर भागातील जुन्या उड्डाणपुलांचा समावेश आहे. यामध्ये लालबाग, हिंदमाता, जगन्नाथ शंकरशेट (दादर टीटी) उड्डाणपूल, कविवर्य केशवसूत उड्डाणपूल, शीव रुग्णालय उड्डाणपूल, जीटीबीनगर आरओबी यांचा समावेश आहे. या पुलांच्या दुरुस्तीसाठी १५ कोटी ८९ लाख ३२ हजार रुपये खर्च येणार आहे. पुलांची कामे पावसाळा वगळून १५ महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
पुलांवरील रस्त्यांची अवस्था वाईट आहे. यामुळे पुलांचे फेरपृष्ठीकरण केले जाणार आहे. पुलांच्या खांबांचीही दुरुस्ती केली जाणार आहे. पुलाशी संबंधित इतर आवश्यक ती दुरुस्तीची कामंही केली जातील.