जुन्या बांधकामाची भिंत कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू
पुणे: पुण्याच्या दौंड शहरात पाऊसाने पहिला बळी घेतला आहे. पावसामुळे ७५ वर्षीय वृद्ध महिलेच्या अंगावर घराची भिंत पडली. यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ताराबाई विश्वचंद आहिर असे ७५ वर्षीय वृद्ध महिलेचे नाव आहे. ताराबाई दुकानात बसल्या असताना हा अपघात घडल्याचे म्हटले जात आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या अंगावर जुन्या बांधकामाची भिंत कोसळली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. अपघातामुळे त्या गंभीररित्या जखमी झाल्या होत्या. रुग्णालयात उपचार सुरु असताना ताराबाई यांचा मृत्यू झाला.
सदर भिंत जुन्या बांधकामाची होती. अचानक झालेल्या पावसामुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी दौंडचे तहसीलदार अरुण शेलार यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
पुण्यात पावसाची झड कायम
महाराष्ट्रात 26 मे रोजी धडकलेल्या मान्सूनने पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक एन्ट्री केली आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे महाराष्ट्राच्या बहुतांश भागात तुफान पाऊस होत आहे. अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झालीय. पुण्यात पावसाची झड कायम असून, रविवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे पुण्यात अनेक ठिकाणी मोठी पडझड होत आहे. रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तसेच अनेक जनजीवन विस्कळीत झाले आहे.
अनेक गावांशी रस्ते संपर्क तुटला
जिल्हा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, बारामतीमध्ये सुमारे 150आणि इंदापूरमध्ये 70हून अधिक घरे पाण्याखाली गेली आहेत. पाण्याखाली जाणाऱ्या अनेक गावांशी रस्ते संपर्क तुटला आहे, ज्यामुळे बचाव कार्यात अडचणी येत आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (एनडीआरएफ) स्थलांतरितांना मदत करण्यासाठी दोन पथके तैनात केली. स्थानिक अधिकारी आणि एनडीआरएफ कर्मचाऱ्यांनी बचाव कार्यात समन्वय साधला आणि बारामतीमध्ये आठ ठिकाणी उभारलेल्या तात्पुरत्या निवार्यांमध्ये बाधित रहिवाशांना हलवले. सुरुवातीला बारामतीमध्ये सात आणि इंदापूरमध्ये दोघांना अडकल्याचे वृत्त होते परंतु त्यांना यशस्वीरित्या वाचवण्यात आले. त्यानंतर, नीरा नदीने आपला मार्ग बदलल्यानंतर अडकलेल्या आणखी सहा जणांना वाचवण्यासाठी एनडीआरएफ पथक सोलापूर जिल्ह्यातील मार्कड वस्ती येथे रवाना करण्यात आले. बचाव कार्य सुरूच आहे.