आज राज्यात वादळी वाऱ्यासह वळिवाच्या पावसाचा तडाखा, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा
मुंबई : सध्या संपूर्ण राज्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई तसेच मुंबई लगत इतर परिसरात देखील पावसाच्या हलक्या सरी बरसत असल्या, तरी पुढील तीन दिवस मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवाखान खात्यातून वर्तवण्यात आली आहे.
मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबईतील किमान तापमान 20 मे रोजी 26 अंश सेल्सिअस राहील. तर मुंबईतील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. मुंबईत ढगाळ वातावरण राहील.
राज्यात वळिवाच्या पावसाचा तडाखा
राज्यातील काही भागात वळिवाच्या पावसाने तडाखा दिला आहे. यामुळे काही प्रमाणात फळबागांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, पावसामुळे तापमानात घट झाली असली तरी उकाडा मात्र कायम आहे. सकाळी ११ ते १२ पर्यंत उन्हाचा ताप आणि दुपारनंतर वादळी पाऊस असे वातावरण अनेक भागात आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पुन्हा पाऊस हजेरी लावणार आहे. वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होईल. या पट्ट्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मे महिन्यातच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मान्सूनपूर्वी शेतीची मशागत खोळंबली आहे. पण यामुळे रान आबादानी झाले आहे.
राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता
पुण्यात 20 मे रोजी किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहील. तर कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. पुण्यात 20 मे रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल, असा अंदाज आहे. कोल्हापूर, सातारा, धाराशिव, सांगली, सोलापूर, लातूर, सिंधुदुर्ग आणि पुण्यालाही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. इथे विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
या भागांसाठी यलो अलर्ट
छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार या भागांत मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूरमध्ये तापमान साधारणपणे 28 ते 42 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. इथे वेगाने वारे वाहतील. तसेच विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन
हवामानात बदल होत असल्याने नागरिकांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. तसेच शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेणे आवश्यक आहे. राज्यासाठी 20 मे नंतरचे काही दिवस पावसाच्या दृष्टीने महत्वाचे ठरतील. पुढच्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर अधिक वाढू शकतो. त्यामुळे सतर्क राहण्याची सूचना प्रशासनाकडून देण्यात आली आहे.