मुंबई: राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या खात्याची जबाबदारी आता छगन भुजबळ यांच्याकडे देऊन त्यांची नाराजी दूर केली जाणार असल्याची चर्चा आहे. कारण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार केला तेव्हा त्यात अनेक वरिष्ठांची नावं नव्हती त्यापैकी एक नाव छगन भुजबळ यांचं देखील होतं. मंत्रिपद न मिळाल्याची खंत त्यांनी अनेकदा व्यक्त केली होती. तसेच त्यांनी अजित पवारांवरही टीका केल्याचं दिसून आलं. त्यावेळी 'जहाँ नहीं चैना वहाँ नहीं रहना' हा छगन भुजबळांचा डायलॉगही गाजला होता. आता याच भुजबळांची मंत्रिमंडळात वर्णी लागत आहे. आज ते मंगळवारी दि. 20 मे रोजी सकाळी 10 च्या सुमारास राजभवनात शपथ घेतील. उशिरा का असेना पण छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी होती. छगन भुजबळ यांना हेच खातं दिलं जाईल अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. मात्र आता नेमकं छगन भुजबळांना कुठलं खातं मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
"ज्याचा शेवट चांगला ते सगळं चांगलं" - भुजबळ
आज सकाळी 10 वाजता छगन भुजबळ यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. तत्पूर्वी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना छगन भुजबळ यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांचे आभार मानले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे देखील आभार मानले. हे सगळं आठ दिवसांपूर्वीच ठरलं होतं. त्यानंतर आता शपथविधी होतो आहे. ज्याचा शेवट चांगला ते सगळं चांगलं असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
ओबीसी मतदारांना खुश करण्यासाठी निर्णय
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी मतदार आपल्यासोबत राहण्यासाठी महायुतीकडून आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ही राजकीय खेळी खेळल्याची चर्चाही या निमित्ताने रंगू लागली आहे. धनंजय मुंडे यांच्या रुपाने ओबीसी नेतृत्व मंत्रिमंडळात होतं. पण त्यांना संतोष देशमुख प्रकरणात राजीनामा द्यावा लागल्याने आता छगन भुजबळांच्या रुपाने ओबीसी नेता मंत्रिमंडळात असणार आहे.