नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता आम आदमी पार्टीला (AAP) पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या पक्षातील तब्बल १५ लोकप्रतिनिधींनी राजीनामा दिला असून, लवकरच नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा त्यांनी केली आहे.
आम आदमी पार्टीच्या बंडखोर नेत्यांनी एमसीडीमध्ये एक वेगळा गट स्थापन केला आहे. या नगर नगरसेवकांनी आम आदमी पक्षाचा राजीनामा देऊन इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. हेमचंद्र गोयल यांच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर मुकेश गोयल पक्षाचे अध्यक्ष असतील.
बंडखोर लोकप्रतिनिधींची नावे
आम आदमी पक्षातून राजीनामा दिलेल्या नगरसेवकांमध्ये हेमन चंद गोयल, दिनेश भारद्वाज, हिमानी जैन, उषा शर्मा, साहिब कुमार, राखी कुमार, अशोक पांडे, राजेश कुमार, अनिल राणा, देवेंद्र कुमार, हिमानी जैन यांचा समावेश आहे. आम आदमी पक्षाने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याचा आरोप बंडखोर नगरसेवकांनी केला आहे. २०२२ मध्ये ते आम आदमी पक्षाच्या तिकिटावर एमसीडीमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले. परंतु एमसीडीमध्ये सत्तेत येऊनही आम आदमी पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व ते सुरळीत चालवू शकले नाही.
याबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना मुकेश गोयल म्हणाले, "आम्ही इंद्रप्रस्थ विकास पक्ष नावाचा एक नवीन पक्ष स्थापन केला आहे. आम्ही आपमधून राजीनामा दिला आहे. सत्तेत असूनही, आम्ही दिल्लीच्या जनतेच्या सेवेसाठी काम करू शकलो नाही. अंतर्गत संघर्षांमुळे आम्ही काम करू शकलो नाही. "