
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाचा कोकण विभाग म्हणजेच म्हाडा कोकण जुलै २०२५ मध्ये चार हजार घरांची सोडत काढण्याची तयारी करत आहे. या सोडतीतील अर्थात लॉटरीतील किमान एक हजार घरं ही ठाण्यातील चितळसर भागात आहेत. कल्याणमध्येही शेकडो घरांचा पर्याय या सोडतीमुळे उपलब्ध होणार आहे.
याआधी २०२४ मध्ये म्हाडा मुंबईची सोडत निघाली होती. आता म्हाडा कोकणची सोडत निघणार आहे. जुलै महिन्यात कोकण विभाग कल्याण आणि ठाणे शहरांसाठी सोडत जाहीर करेल. म्हाडाच्या कोकण मंडळाने गेल्या दीड वर्षात तीन सोडती काढल्या. याद्वारे सुमारे दहा हजार लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आता जुलै २०२५ मध्ये म्हाडा कोकण काढणार असलेल्या सोडतीमुळे हजारो नागरिकांचे मुंबई जवळ हक्काचे घर घेण्याचे स्वप्न साकार होणार आहे.
म्हाडाने महाराष्ट्रात २०२५ - २६ या आर्थिक वर्षात १९ हजार ४९७ घरे बांधण्याचे ध्येय निश्चित केले आहे. यात मुंबईतील पाच हजार १९९ घरांचा समावेश आहे. यामुळे घर खरेदी करण्याच्या प्रतीक्षेत लोकांना दिलासा मिळण्यास मदत होईल. म्हाडा कोकणात नऊ हजार ९०२, पुण्यात १८३६, नागपूरमध्ये ६९२, छत्रपती संभाजीनगरमध्ये १६०८, नाशिकमध्ये ९१, अमरावतीत १६९ घरे बांधण्याचे उद्दीष्ट डोळ्यांपुढे ठेवून काम करत आहे. म्हाडाने मुंबईतील घरांसाठी ५७४९.४९ कोटी, कोकणातील घरांसाठी १४०८.८५ कोटी, पुण्यातील घरांसाठी ५८५, नागपूरच्या घरांसाठी १००९ कोटी, छत्रपती संभाजीनगरमधील घरांसाठी ६५.९६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.