नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा आणि इंधन गॅसचा पुरेसा साठा आहे. या साठ्याचा सुरळीत पुरवठा सुरू आहे. यामुळे नागरिकांनी घाबरण्याची किंवा चिंता करण्याची तसेच साठेबाजी करण्याची आवश्यकता नाही. ही माहिती इंडियन ऑईल आणि बीपीसीएल कंपनीने दिली आहे.
बीपीसीएलकडून संपूर्ण भारतात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी साठा अखंड उपलब्ध
आमच्या विशाल देशव्यापी नेटवर्कमध्ये पुरेसे पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजी साठा उपलब्ध असल्याची खात्री फॉर्च्यून ग्लोबल ५०० कंपनी आणि भारतातील आघाडीच्या तेल आणि वायू कंपन्यांपैकी एक असलेली भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) सर्व नागरिकांना दिली आहे.
त्यांच्या देशव्यापी नेटवर्कमधील सर्व बीपीसीएल इंधन केंद्रे आणि एलपीजी वितरक सुरळीतपणे कार्यरत आहेत आणि ग्राहकांच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज आहेत.
नागरिकांनी काळजी करण्याचे किंवा घाबरून तातडीने आवश्यक खरेदी करण्याचे कोणतेही कारण नाही. आमचे पुरवठा साखळी ऑपरेशन्स मजबूत आणि कार्यक्षम आहेत, ज्यामुळे अखंड पुरवठा सुनिश्चित होतो.
बीपीसीएल ऊर्जा सुलभता आणि विश्वासार्हतेसाठी त्यांच्या वचनबद्धतेवर दृढ असून आम्ही सर्व ग्राहकांना शांत राहण्याचे आवाहन भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) ने केले आहे.
दरम्यान, पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २२ एप्रिल रोजी भारतात पहलगाम येथे हल्ला केला आणि २५ भारतीय तसेच एका नेपाळी नागरिकाची हत्या केली. यानंतर भारताने बुधवार ७ मे रोजी पाकिस्तान व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील अतिरेक्यांच्या तळांवर कारवाई केली. पण अतिरेक्यांचा जोडीदार असलेल्या पाकिस्तानचा संताप झाला. त्यांनी लगेच ७ मे रोजी रात्री आणि ८ मे रोजी मध्यरात्री भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याला उत्तर म्हणून भारताने पाकिस्तानमधील निवडक शहरांवर मोजक्या ड्रोनच्या मदतीने हल्ला केला. ही कारवाई कमालीची यशस्वी झाली. ड्रोन हल्ल्यामुळे भडकलेल्या पाकिस्तानने ८ मे रोजी रात्रीपासूनच भारतावर हल्ले करण्याचा पुन्हा प्रयत्न केला. यावेळी पाकिस्तानने नागरी वस्ती आणि सैन्याची आस्थापने या दोन्हीला लक्ष्य करुन हवाई हल्ले सुरू केले. तसेच सीमेवर गोळीबार आणि जड तोफांचा मारा सुरू केला. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारताने प्रचंड वेगाने आणि अतिशय प्रभावी उत्तर दिले. पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांना आकाशातच नष्ट केल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये ठिकठिकाणी तीव्र हल्ले केले. पाकिस्तानच्या सर्व विमानतळांना आणि सैन्याच्या आस्थापनांना लक्ष्य करुन हल्ले करायला सुरुवात झाली. या कारवाईमध्ये भारताने पाकिस्तानचे अनेक ड्रोन, लहान - मोठी क्षेपणास्त्र, लढाऊ विमानं, अॅवॅक्स रडार नष्ट केले. भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या कराची बंदरात आणि अनेक विमानतळांवर सतत स्फोट होत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. ही परिस्थिती सकाळ उजाडली तरी कायम आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढू लागला आहे.