
इस्लामाबाद : भारताने अतिरेक्यांच्या विरोधात पाकिस्तानमध्ये केलेल्या ऑपरेशन सिंदूर केले. यात पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील एकूण नऊ अतिरेकी तळांवर हल्ला करण्यात आला. यापैकी एक हल्ला हा बहावलपूर येथील जैश - ए - मोहम्मद या पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटनेच्या तळावर करण्यात आला. बहावलपूरच्या हल्ल्यात जैश - ए - मोहम्मदचा एक कमांडर रउफ असगर ठार झाला. भारताने बुधवार ७ मे रोजी मध्यरात्री केलेल्या हल्ल्यात रउफ असगर ठार झाला. या संदर्भातले वृत्त गुरुवार ८ मे रोजी आले.
जैश - ए - मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरच्या कुटुंबातील दहा आणि त्याचे विश्वासू असलेले चार असे एकूण चौदा जण बहावलपूरच्या हल्ल्यात ठार झाले. या चौदा जणांमध्ये अतिरेकी रउफ असगर होता. रउफ असगर हा भार इंडियन एअरलाईन्स कंपनीच्या आयसी ८१४ या विमानाच्या अपहरणाचा सूत्रधार होता. हे विमान कंदहार येथे नेण्यात आले होते. हे विमान आणि त्यातील प्रवासी यांच्या सुरक्षित सुटकेसाठी भारत सरकारला पाच अतिरेक्यांची सुटका करावी लागली होती. या अतिरेक्यांमध्ये मसूद अजहर पण होता.
रउफ हा अतिरेकी फक्त विमान अपहरणातच नाही तर पठाणकोट येथील हल्ला आणि भारताच्या संसदेवर झालेला अतिरेकी हल्ला या दोन हल्ल्यांचाही सूत्रधार होता.
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेत पाकिस्तानच्या सैन्यातले अधिकारी
भारताने ऑपरेशन सिंदूर केले. या ऑपरेशनमध्ये ठार झालेल्या अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेत पाकिस्तानच्या सैन्यातले आणि गुप्तचर यंत्रणेतले अधिकारी सहभागी झाले. अतिरेकी रउफ असगरचा सुपुर्द - ए - खाक हा विधी पाकिस्तानच्या सैन्यातल्या आणि गुप्तचर यंत्रणेतल्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाला. जो रउफ भारतात अनेक वर्षे मोस्ट वाँटेड होता त्याचा जनाजा (अंत्ययात्रा) निघाला असताना पाकिस्तानच्या सैन्यातल्या आणि गुप्तचर यंत्रणेतल्या अधिकाऱ्यांची उपस्थितीतच पाकिस्तान आणि अतिरेकी यांचे लागेबांधे सिद्ध करण्यास पुरेशी आहे.