
पाकिस्तान सोबतचा कित्येक वर्ष सुरू असलेला सिंधू पाणी वाटप करार रद्द केल्यानंतर, आता चिनाब नदीचे पाणी देखील अडवण्याचा निर्णय भारताने घेतला आहे, हा पाकिस्तानसाठी भारताकडून आणखी एक जबरदस्त धक्का म्हणता येईल.
बागलीहार धरणातून पाणी अडवले जाणार
सिंधू करार रद्द केल्यानंतर वुलर सरोवराचे पाणीही पाकिस्तानसाठी बंद झाले आहे. त्यानंतर आता चिनाब नदीवर असलेल्या बागलीहार प्रकल्पाचे पाणी धरणाद्वारे अडवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जम्मूच्या रामबनमध्ये असलेल्या बागलीहार प्रकल्पातील पाणी नियंत्रित करण्याची क्षमता भारताकडे आहे. तसंच, झेलम नदीवर असलेल्या किशनगंगा प्रकल्पासंदर्भातही भारत लवकरच कडक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
बागलीहार प्रकल्पावरून दीर्घकालीन वाद
जम्मू-कश्मीरमधील बागलीहार जलविद्युत प्रकल्प पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील वादाचा केंद्रबिंदू ठरला आहे.
बागलीहार धरण हा भारत आणि पाकिस्तानमधील अनेक वर्षांपासूनचा वादाचा मुद्दा आहे. पाकिस्तानने यापूर्वीही याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेषत: जागतिक बँकेकडे मध्यस्थतेची मागणी केली होती. त्याचप्रमाणे, किशनगंगा प्रकल्पामुळे झेलमची उपनदी नीलम नदीच्या प्रवाहावर होणाऱ्या परिणामांविषयीही पाकिस्तानने आक्षेप नोंदवले आहेत.