हीच योग्य वेळ, आता भारताने पाकिस्तानच्या नरडीचा घोट घेतला पाहिजे; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्याचे ठाम मत

  104

नवी दिल्ली/वॉशिंग्टन : पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही संताप उसळला आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी ‘काश्मीर ही पाकिस्तानच्या गळ्याची नस आहे’ असे वक्तव्य केले आहे. यावर, अमेरिका थिंक टँक 'अमेरिकन एंटरप्राइझ इन्स्टिट्यूट'चे वरिष्ठ फेलो आणि पेंटागॉनचे माजी अधिकारी मायकेल रुबिन (Michael Rubin) यांनी "जर काश्मीर त्यांच्या कंठाची नस आहे, तर भारताने त्या नरडीचा घोट घेतलाच पाहिजे!" असे थेट प्रत्युत्तर दिले आहे.


रुबिन यांनी असीम मुनीर यांची तुलना थेट ओसामा बिन लादेनशी केली. "फरक एवढाच की, लादेन गुहेत होता, मुनीर राजवाड्यात राहतो," असे सांगत त्यांनी पाकिस्तानवर आणि त्यांच्या सैन्यावर जबरदस्त टीका केली. पाकिस्तान दहशतवादाचे उगमस्थान असून, इस्लामाबादने याला हिरवा कंदील दिला आहे, असे स्पष्ट म्हणत त्यांनी अमेरिकेलाही पाकिस्तानविरुद्ध अधिक कठोर भूमिका घेण्याचे आवाहन केले.



ज्या वेळी पहलगामचा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स भारतात होते. याआधी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या भारत भेटीदरम्यान झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रमाणेच यावेळीही असाच हल्ला करण्यात आला. जेडी व्हान्स यांच्या भारतभेटीवरून लक्ष विचलित करण्याचा हा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. राजकीयदृष्ट्या हल्ल्याची वेळ निश्चित केली होती. हे धक्कादायक आहे; पण यातून हेच दिसते की, तुम्ही डुकराला कितीही लाली, लिपस्टिक लावा, पण ते डुक्करच राहाते. आम्ही दहशतवादाचा पुरस्कार करत नाही, असे कितीही दाखवण्याचा पाकिस्तानने प्रयत्न केला तरी, तो दहशतवादाला खतपाणी घालतच राहील, असेही त्यांनी म्हटले आहे.



तसेच अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवादाला खतपाणी घालणारा देश म्हणून घोषित करावे आणि असीम मुनीरला दहशतवादी घोषित करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.



रुबिन यांनी म्हटले आहे की, "आता कोणताही शॉर्टकट नको. आयएसआय आणि पाक सैन्याचे नेते हे दहशतवादी आहेत, त्यांना तसेच घोषित केले पाहिजे. भारताने इस्रायलप्रमाणेच कठोर भूमिका घ्यायला हवी."


त्यांनी पहलगाम हल्ल्याची तुलना ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर झालेल्या हमास हल्ल्याशी केली आणि सांगितले की, शांतताप्रिय पर्यटकांना लक्ष्य करणे हीच नवी दहशतवादी रणनीती आहे. अगदी हमासप्रमाणे. भारतातल्या मध्यमवर्गीय हिंदूंवर हल्ला हा केवळ एक दहशतवादी कृत्य नव्हे, तर पाकिस्तानकडून विचारपूर्वक आखलेली खेळी असल्याचा ठपका त्यांनी ठेवला.


या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानविरोधात उचललेली पावले, जसे की सिंधू जल करार स्थगित करणे, अटारी नाका बंद करणे, हे अत्यंत योग्य असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. "पाकिस्तानला जगभरात वेगळं पाडण्याची हीच योग्य वेळ आहे," असा स्पष्ट सल्ला त्यांनी दिला.


पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तैयबासह अनेक दहशतवादी संघटना आहेत, हे आम्हाला माहीत आहे. दुर्दैवाने, पाकिस्तानी राजनैतिक अधिकारी पाश्चात्य देशांना मूर्ख बनवत आहेत. त्यामुळे दहशतवादविरोधी कारवाई कमी झाली, अशी टिप्पणी त्यांनी केली.


रुबिन यांच्या या वक्तव्याने भारताच्या आंतरराष्ट्रीय धोरणांना एक नवा पाठिंबा मिळाला आहे आणि जागतिक स्तरावर पाकिस्तानविरोधात आक्रमक राजनैतिक भूमिका घेण्याचा दबावही वाढतो आहे.

Comments
Add Comment

लंडनमध्ये भारतीय रेस्टॉरंटला आग; पाच जण जखमी

लंडन: लंडनमध्ये एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये आग लावल्याची धक्कादायक घटना समोर

स्वातंत्र्यदिनी युक्रेनचा रशियाच्या अण्वस्त्र प्रकल्पावर ड्रोन हल्ला; मोठा स्फोट होऊन आग

मॉस्को: युक्रेनने रशियाच्या ऊर्जा प्रकल्पांवर पुन्हा एकदा मोठा ड्रोन हल्ला केला आहे. युक्रेनच्या स्वातंत्र्य

न्यूयॉर्कमध्ये भारतीयांना घेऊन जात असलेल्या बसला अपघात, पाच ठार

न्यूयॉर्क : अमेरिकेतून एक दुःखद बातमी आली आहे. न्यूयॉर्क राज्य महामार्गावर एका बसचा अपघात झाला. नायगरा

अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांवर धोक्याची टांगती तलवार, नियमांचे उल्लंघन केल्यास रद्द होणार व्हिसा

वॉशिंग्टन: अमेरिकेत स्थायिक झालेले किंवा तिथे व्हिसावर वास्तव्यास असलेल्या ५.५ कोटी परदेशी नागरिकांच्या

दक्षिण अमेरिकेत ८ रिश्टर क्षमतेचा भूकंप

वॉशिंग्टन डीसी : भारतीय वेळेनुसार शुक्रवारी सकाळी सात वाजून ४६ मिनिटांनी दक्षिण अमेरिकेत ८.० रिश्टर क्षमतेच्या

'श्री गणेश करूया...' म्हणत रशियन राजदूताने सुरू केली अमेिरकेवर टीका

भारत संबंधांवर परिणाम होणार नसल्याची रशियाकडून हमी मॉस्को : रशियाकडून भारताला मिळणाऱ्या कच्च्या तेलाची आयात