नवी दिल्ली : अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा जण आहेत. ही घटना घडल्यानंतर सरकारी यंत्रणा त्वरित सक्रीय झाली आहे. आतापर्यंत तीन अतिरेक्यांची रेखाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहे. लष्कराने अतिरेक्यांना शोधण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावरुन तातडीने दिल्लीत परतले आहेत. अतिरेकी हल्ला मंगळवारी झाला, त्यानंतर तातडीने काश्मीरला रवाना झालेले मुख्यमंत्री संध्याकाळपर्यंत दिल्लीत परतत आहेत. यानंतर दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय संरक्षण समितीची अर्थात कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची बैठक होणार आहे.
पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणात तपास यंत्रणा किती पुढे गेली?
प्रशासनाकडून स्केचेस प्रसिद्ध : तपास यंत्रणेने दहशतवाद्यांचे ३ स्केचेस (रेखाचित्रे) जारी केले आहेत. हे रेखाचित्र मंगळवारी घडवलेल्या दहशतवाद्यांचे आहेत. सुरुवातीच्या माहिती आणि प्रत्यक्षदर्शींशी झालेल्या संभाषणाच्या आधारे ते प्रसिद्ध करण्यात आले आहे. सुरक्षा अधिकाऱ्याच्या अंदाजानुसार दहशतवादी हल्ल्यात तीन ते चार दहशतवाद्यांचा सहभाग आहे. यापैकी दोन पाकिस्तानी नागरिक असल्याचं आढळून आलं आहे. तर उर्वरित हे स्थानिक दहशतवादी आहेत.
रेझिस्टन्स फ्रंट या पाकिस्तानी संघटनेने हा हल्ला घडवून आणला :
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. लष्कर-ए-तैयबाशी जोडलेल्या या दहशतवादी संघटनेचे पूर्ण नाव ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ आहे. काश्मीरमध्ये टीआरएफच्या दहशतवाद्यांनी अनेक हल्ले केले आहेत. पहलगाममधील हल्ला टीआरएफच्या फाल्कन पथकाने केला होता. पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी हेलष्कर-ए-तोयबाशी (एलईटी) निगडीत असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंटशी (टीआरएफ) जोडलेले असल्याची माहिती पुढे येत आहे. इतिहासातील सर्वात भयानक दहशतवादी हल्ल्यापैकी हा हल्ला असल्याचं मानलं जात आहे. टीआरएफला पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेचा आयसिसचा पाठिंबा असल्याचं म्हंटल जातंय. लष्करचे संस्थापक आणि २६/११ चा मास्टरमाइंड हाफिज सईदचे प्रॉक्सी आहे.
Pahalgam Terror Attack : आता मलाही मारा ना…! काल लग्न झालं अन् आज घरातून तिरडी उठणार
दहशतवाद्यांनी कोणती शस्त्रे वापरली?
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याचवेळी, प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी AK-४७ चा वापर केल्याचे मानले जात आहे. १९४७ मध्ये बनवलेल्या AK-४७ रायफलचे पूर्ण नाव ऑटोमॅटिक कलाश्निकोव्ह ४७ आहे. ती मिखाईल कलाश्निकोव्हने बनवली होती. महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण जगात एके-४७ सर्वाधिक बेकायदेशीरपणे विकली जाते.
सैफुल्ला खालिद हा मास्टरमाईंड आहे का?
पहलगाम हल्ल्यात दोन परदेशी दहशतवादी आणि दोन स्थानिक दहशतवादी सहभागी असल्याचे गुप्तचर सूत्रांनी सांगितले. या संघटनेचा उपप्रमुख सैफुल्लाह खालिद हा दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. या सैफुल्लाहचे हाफिज सईदशीही संबंध आहेत आणि भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचे नाव सामील आहे. सैफुल्लाह खालिदला पाकिस्तानकडून पूर्ण पाठिंबा मिळतो आणि त्याचे तेथील सैन्याशीही चांगले संबंध ठेवतो अशी माहिती समोर आली आहे. ते पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधून चालवले जाते. त्याचे स्थान रावळकोट असल्याचे सांगितले जाते. सैफुल्लाहने महिन्याभरापूर्वीच हल्ल्याचा इशारा दिला होता ही सुद्धा सूत्रांची माहिती आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, पंतप्रधान मोदी त्यांचा सौदी दौरा अर्ध्यावरच सोडून देशात परतले. पंतप्रधान मोदी विमानतळावर उतरताच त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत विमानतळावर लगेचच एक मोठी बैठक घेतली. या बैठकीत पंतप्रधान मोदींसोबत अजित डोभाल आणि एस जयशंकर देखील उपस्थित होते.