Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजनाशिक

अवकाळीचा शेतक-यांना मोठा फटका; आंबा, द्राक्ष, डाळींब, कांदा, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान

अवकाळीचा शेतक-यांना मोठा फटका; आंबा, द्राक्ष, डाळींब, कांदा, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान

नाशिक : जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal rains) सटाणा, कळवण, दिंडोरी, नाशिक या चार तालुक्यांना चांगलेच झोडपले. अवकाळीमुळे कांदा, द्राक्षे, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात १२९७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून यात ११७५ हेक्टर क्षेत्रावरील कांदा पिकाचा समावेश आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या १९९० आहे.


हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांनी कांदा काढणीस लगबगीने सुरूवात केली होती. मात्र, काढून ठेवलेला कांदा शेतातच झाकून ठेवल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तसेच काढणी योग्य कांद्याचे देखील नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक नुकसान सटाणा तालुक्यात झाले असून तालुक्यात ११०० क्टरवरील कांदा पिकाचे नुकसान झाले. ५० हेक्टरवरील भाजीपाला, १५ हेक्टरवरील डाळिंब अशा एकूण ११५५ हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. या पावसामध्ये पीका नुसार कांदा - ११७५, द्राक्ष -१९.८० भाजीपाला - ६०.६०, गहू - १०, टोमॅटो १०, डाळींब -१९.६०, इतर २, हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे.



तालुक्यातील औंदाणे, कौतिकपाडे, बिजोठे, आखतवाडे, निताणे, पारनेर, जायखेडा, नांदीन, दरेगाव, तांदूळवाडी, मोसम आरम परिसरात गारांचा पाऊस झाल्याने तालुक्यातील १७०० शेतकऱ्यांना याचा फटका बसला. दिंडोरी तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. पावसाचा कांदा, द्राक्षे, गहू, हरभरा आदी पिकांना फटका बसला प्राथमिक अहवालानुसार ८ हेक्टरवरील कांदा, ५.८० हेक्टरवरील द्राक्षे अशा एकूण १५ हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली. कळवण तालुक्यात ५५ हेक्टरवरील कांदा, १० हेक्टरवरील भाजीपाला व १० हेक्टर क्षेत्रावरील टोमॅटो पिकाचे नुकसान झाले आहे.



बार्शीत अवकाळीचा शेतकऱ्यांना फटका


सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरी, मळेगाव, हिंगणी, बोरगाव, झाडी, उपळे, महागाव, पिंपळगाव, जामगाव, कापशी परिसरात वादळ आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. जवळपास अर्धा तास कोसळलेल्या या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कांदा पिकांसह ज्वारी, गहू, हरभरा, आंबा, द्राक्ष या पिकांना मोठा फटका बसला आहे. या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी शेतकऱ्यांमध्ये मात्र चिंता वाढली आहे.


दोन दिवसांपासून या भागात ढगाळ वातावरण होते. दिवसभर उन्हाची तीव्रता जाणवत असतानाही सायंकाळी अचानक वातावरण बदलले आणि जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे काढणीला आलेली पिके मोठ्या प्रमाणावर भिजली. कांदा, ज्वारी, गहू आणि हरभऱ्याच्या पिकांवरही या पावसाचा प्रतिकूल परिणाम झाला आहे. आंबा, द्राक्ष बागायतदारांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे.

Comments
Add Comment