नवी मुंबई : नवी मुंबईकरांनो पाण्याचा अपव्यय टाळा. ऐन उन्हाळ्यात नवी मुंबईतील पाणीपुरवठा आज (शुक्रवार २८ मार्च) बंद राहणार असल्याची बातमी समोर आली आहे. मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे नवी मुंबईकरांना पाणी जपून वापरावं लागणार आहे. यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
Transgender Crime : युवतीला पळवून नेण्याचा तृतीयपंथीयाचा प्रयत्न फसला
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीत सी.बी.डी. बेलापूर, सेक्टर २८ येथे काल (दि २७) गळती सुरू झाली. सदर ठिकाणी तातडीने जलवाहिनी दुरुस्तीचे काम आज (दि २८) शुक्रवार रोजी सकाळी ११.०० वाजता हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रास होणारा पाणीपुरवठा आज (दि २८) रोजी सकाळी ११.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत बंद करावा लागणार आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रास आणि सिडको क्षेत्रातील खारघर आणि कामोठे येथे होणारा आज संध्याकाळचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच शनिवारी २९ मार्च रोजी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याचं महापालिकाने सांगितलं आहे. या कालावधीत नागरिकांनी पाणी जपून वापरावे आणि नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान याचा फटका नवी मुंबईकरांना बसणार आहे.