मुंबई (प्रज्ञा मणेरीकर) : या धकाधकीच्या आयुष्यात आज एका घरात राहणाऱ्या लोकांना एकमेकांशी बोलायला वेळ नसतो, आई-वडिल, बहिण-भाऊ, नवरा-बायको यांच्या गप्पा अशा फारशा होणे आता फारच कठीण झाले आहे. कामाच्या व्यस्थतेमुळे आजच्या काळात घरातही कोणी सहज गप्पा मारू शकत नाहीये, त्यामुळे अनेकदा मला माझ्या कुटुंबासोबत ‘क्वालिटी टाईम’ मिळत नाहीये, अशी अनेक वाक्ये ऐकू येतात. ही घरातल्या तरूणांची कथा आहे. तर घरातल्या ज्येष्ठ नागरिकांची तर त्यांच्या फक्त आरोग्याविषयीच चौकशी होते. अशावेळी आपल्या मनातले बोलायला त्यांना जे माणूस हवे आहे ती नेहा भगत आहे. नेहा यांना या सगळ्या आजी-आजोबांशी, काका काकूंशी बोलायला फार आवडते. कधीकधी त्यांना बोलत करण्याची जबाबदारी माझी आहे असे समजून नेहा त्यांच्याशी बोलत असतात. त्या म्हणतात की, ‘त्यांना काय हवे असते… फक्त माझा १० मिनिटाचा वेळ… तो मी त्यांना नक्कीच देऊ शकते. दुसऱ्याला आनंद दिल्याने आपला आनंद द्विगुणीत होतो ही उक्ती किती खरी आहे याचा मला प्रत्यय येतो आहे.’ या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांशी बोलून नेहा यांना ‘व्यक्त व्हा’ ही संस्था सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. या संस्थेअंतर्गत नेहा यांनी अनेक छोटे-मोठे उपक्रम हाताळले आहेत. या कार्यातून सामाजिक बांधीलकी जपता येते याचे त्यांना समाधान मिळत आहे.
नेहा भगत यांचे शिक्षण डिप्लोमा इन आर्टसमध्ये झाले असून त्या गेली १५ वर्षे जाहिरात क्षेत्रात कला दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत. नेहा यांची कॉर्पोरेट क्षेत्रात स्वत:ची कंपनी आहे. त्यामुळे त्यांच्या व्यस्त वेळेतूनही या संस्थेसाठी त्या आपला मौलिक वेळ काढतात. एक उदाहरण देताना त्या म्हणाल्या की, ‘माझ्या जवळच्या फूलवालीने माझ्याकडे कपड्यांची मागणी केली. अधिक चौकशी केल्यावर कळले की हे कपडे तिला भावाने घरातून हाकलून दिलेल्या एका महिलेला(बहिणीला) द्यायचे आहेत. मी तिच्याकडे एक दिवसाची मुदत मागितली. आणि तिला आवश्यक अगदी सगळ्या कपड्यांची मी तयारी केली आणि तिला द्यायला गेले. त्याचवेळी मला फूलवालीने तिच्या आत्महत्येची कहाणी सांगितली. भावाने घरातून बाहेर काढल्यावर वडिल धसक्याने गेले, आणि आता आपले कुणी उरले नाही या विचारांनी आई आणि त्या मुलीने आत्महत्या केली. त्याचवेळी आपण त्यांच्याशी बोललो असतो, तर त्यांना आत्महत्येच्या विचारापासून प्रवृत्त करू शकलो असतो, ही खंत सतत वाटत राहते.’
नेहा म्हणतात की, दादर येथील शिवाजी पार्कमध्ये अनेक सुखवस्तू ज्येष्ठ नागरिक फेरफटका मारायला येतात. त्यांची मुले परदेशात असतात. त्यामुळे त्यांच्याशी बोलायची वेळ त्यांना पाळावी लागते. तिकडच्या वेळेत आणि आपल्या वेळेत ८ ते १० तासाचा फरक असल्यामुळे पहाटे किंवा रात्रीच त्यांच्याशी बोलता येते. दिवसभर ही मंडळी घरात एकटीच असतात, त्यामुळे त्यांना भरपूर बोलायचे असते. त्यांचे विचार, अनुभव, कल्पना मांडायला कुणीच नसते. अशावेळी नेहा त्यांच्या व्यस्त जीवनातील छोटासा वेळ त्यांना देतात. कधीकधी अगदी वाटेत उभे राहूनही त्यांच्याशी चार शब्द बोलतात, ऐकतात. यामुळे ही मंडळी प्रचंड खूष होतात.
आपले आईवडिल घरात बोलत नाहीत, तर त्यांच्या मनात खूप साचले असेल व त्यांच्याशी आपण थोडेफार बोलावे एवढा वेळही घरातल्या माणसांना नसतो. जो विषय ज्येष्ठ नागरिकांचा तीच तऱ्हा महिला व लहान मुलांची आहे. मग ही मुले मोबाईलमध्ये व्यस्त होतात. यासाठीच नेहा भगत यांनी शाळांमध्ये जाऊन मोबाईलचे व्यसन टाळण्यासाठी काय करता येईल? यासाठी एक चर्चासत्र आयोजित केले होते. तसेच आता ज्येष्ठ नागरिक व महिला सायबर गुन्ह्यांच्या तडाख्यात अडकत आहेत, त्यासाठी जनजागृतीचे काम करण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. पोलिसांच्या व कायदेविषयक सल्लगारांच्या मदतीने त्या लवकरच याबाबत चर्चासत्र आणि जनजागृतीचे काम करणार आहेत. यासाठी त्यांना मदत करण्याचे प्रहार परिवाराने आश्वासन दिले.