मुंबई : अबू आझमी (Abu Azmi) यांनी औरंगजेबावर केलेल्या विधानावरून महाराष्ट्रात राजकीय गदारोळ सुरू आहे. काल (३ मार्च) आझमी यांच्या वक्तव्याच्या मुद्द्यावरून अर्थसंकल्पीय अधिवेशन दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले होते. त्यानंतर आज देखील हे अधिवेशन उद्यावर ढकलण्यात आले आहे. दरम्यान, अबू आझमीने केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला जात आहे. अशातच मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी देखील अबू आझमीवर घणाघात केला आहे.
“छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू स्वराज्य स्थापन केले. मुघलांनी आपली हिंदू मंदिरे उद्ध्वस्त केली, लोकांचे धर्मांतर केले, शिवाजी महाराजांनी याविरुद्ध आवाज उठवला आणि जर अबू आझमी हे समजू शकले नाहीत तर त्यांनाही औरंगजेबाकडे पाठवावे लागेल. निलंबनाने काहीही होणार नाही, त्यांना औरंगजेबाच्या शेजारीच कबरीत पुरले पाहिजे,” असे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी म्हटले आहे.
अबू आझमींनी इतिहास वाचला पाहिजे – शायना एनसी
शिवसेना महिला नेत्या शायना एनसी यांनीही अबू आझमींच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “अबू आझमी यांनी प्रथम इतिहासाची पाने उलटावीत जेणेकरून त्यांना कळेल की औरंगजेबाने किती हिंदू मंदिरे उद्ध्वस्त केली. यामध्ये त्र्यंबकेश्वर मंदिर आणि काशी विश्वनाथच्या शेजारी असलेले छोटे मंदिर समाविष्ट आहे.”