Sunday, June 1, 2025

महामुंबई

मनपा कर्मचाऱ्यांनी आधी स्वत:चा मालमत्ता कर भरावा

मनपा कर्मचाऱ्यांनी आधी स्वत:चा मालमत्ता कर भरावा

दुर्लक्ष करणाऱ्या कारवाईचे मनपा आयुक्तांनी दिले संकेत


उल्हासनगर : शहरातील ९५० कोटींची मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी उल्हासनगर पालिका प्रशासनाने अभय योजना लागू केली आहे. नागरिकांना अभय योजनेत सहभागी होण्यासाठी पालिका प्रशासनाने आधी आपल्या कर्मचाऱ्यांना आपले सर्व मालमत्ता थकीत कर भरण्याचे आदेश दिले आहेत. ज्यांची थकबाकी आहे त्यांनी ती वेळेत भरून तसे शून्य देयक पावती सादर करण्याचेही आदेश दिले आहेत. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेतही आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी दिले आहेत.



महापालिका प्रशासनाने अंतिम अभय योजना लागू केली आहे. तीन टप्प्यात अंमलबजावणी केल्या जाणाऱ्या या योजनेत मालमत्ताधारकांना थकबाकीवरील शास्ती माफ केली जाणार आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाकडून प्रचार प्रसार केला जात आहे. गेल्या तीन दिवसात सरासरी दोन कोटी रूपयांची वसूली या माध्यमातून होते आहे. उल्हासनगर महापालिकेतील मालमत्ता धारकांची संख्या १ लाख ८३ हजार अाहे.


महापालिकेचे अनेक कर्मचारीच थकबाकीदार


डॉक्टर्स, अधिक्षक, वरिष्ठ लिपीक, लिपीक, शिक्षक, मनपा नर्स, मुकादम, माळी, मजुर, सफाई कामगार, तारतंत्री, विजतंत्री, शिपाई, विद्युत मदतनीस, सुरक्षारक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कस अशा सर्वांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांपैकी अनेक जण थकबाकीदार असल्याची माहिती आहे. त्यामुळे नागरिकांना आवाहन करत असतानाच पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही थकबाकीची रक्कम वेळेत अदा करणे आवश्यक आहे.


त्यामुळे उल्हासनगर महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना तातडीने आपली थकबाकी भरण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी पालिका आयुक्तांनी आदेश जाहीर केले असून ज्यांनी आपल्या मालमत्ता कराचा भरणा केला नसेल त्यांनी या योजनेच्या कालावधीमध्ये आपला मालमत्ता कराचा भरणा करून कराचे देयक शुन्य असल्याबाबतची करपावती प्रत सादर करावी, असे लेखी आदेश आयुक्तांनी दिले आहेत.


Comments
Add Comment