श्रीकांत शिंदेंचं आमंत्रण उद्धव ठाकरेंचे आमदार स्वीकारणार ?

  118

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यामुळे पहिल्यांदाच आमदार झालेल्या राज्यातील ७८ जणांचे दिल्लीत संसदीय कामकाज प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत. विधिमंडळ सचिवालयानं प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या निमित्ताने दिल्लीत असलेल्या ७८ आमदारांना शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी जेवणासाठी आमंत्रित केले आहे. दिल्लीत १२ पंडित पंत मार्गावर खासदार श्रीकांत शिंदे यांचा सरकारी बंगला आहे. या बंगल्यावर आमदारांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे. आमंत्रितांमध्ये महाविकास आघाडीचे २० आमदार आहेत. यात उद्धव ठाकरेंच्या नवोदीत आमदारांचाही समावेश आहे. हे आमदार श्रीकांत शिंदेंचं आमंत्रण स्वीकारणार की नाही याकडे अनेकांचे लक्ष आहे.



मुंबईत सोमवारी १० फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची दादरच्या शिवतीर्थ बंगल्यावर भेट घेतली. या भेटीला काही तास उलटत नाहीत तोच उद्धव ठाकरे गटाचे विधान परिषदेतील आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेतली. ही भेट मुख्यमंत्र्यांच्या सागर बंगल्यावर झाली. याआधी रायगड जिल्ह्यात पोलादपूरमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे गटाच्या सदस्य आणि गोगावले यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवलेल्या स्नेहल जगताप आणि मंत्री भरत गोगावले तसेच भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांची भेट झाली. तर रत्नागिरी जिल्ह्यात उद्धव ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आता उघडपणे होऊ लागली आहे. उद्धव गटाला खिंडार पडेल, असे भाकीत राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी केले होते. या घडामोडी सुरू असतानाच श्रीकांत शिंदेंनी आमंत्रण दिल्यामुळे फक्त उद्धव गटालाच नाही तर मविआला मोठं खिडार पडणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.



दिल्लीत ७ फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरेंच्या खासदांनी एकजूट दाखवण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला गटाचे लोकसभेतील नऊ पैकी आठ खासदार उपस्थित होते. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय दीन पाटील या पत्रकार परिषदेला गैरहजर होते. यामुळे खासदार संजय दीना पाटील हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे गटाचे नऊ खासदार लोकसभेवर आणि २० आमदार विधानसभेवर निवडून गेले आहेत. यामुळे उद्धव गटाचे लोकसभेतील किमान सहा खासदार आणि विधानसभेतील किमान १४ आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करत असल्यास त्यांच्या विरोधात पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत कारवाई करता येणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. जर लोकप्रतिनिधी टप्प्याटप्प्याने प्रवेश करणार असतील तर त्यांना राजीनामा देऊन आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या तिकिटावर पोटनिवडणुकीद्वारे पुन्हा निवडून येऊन स्वतःची स्थिती मजबूत करता येईल. या दोन पैकी कोणताही पर्याय वापरुन लोकप्रतिनिधींनी उद्धव ठाकरे गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर तो मविआसाठी घातक ठरणार आहे. राज्यात मविआचे मर्यादीत संख्याबळ आहे. यामुळे उद्धव गट फुटल्यास राज्यातील मविआ आणि राष्ट्रीय राजकारणात काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडी आघाडी कमकुवत होण्याचा आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकीय अस्तित्वापुढे प्रश्न निर्माण होण्याचाही धोका आहे. संसदेत वक्फ बोर्ड विधेयक, समान नागरी कायदा, एक देश - एक निवडणूक कायदा असे कायदे मंजुरीसाठी सादर होतील त्यावेळी विरोधकांची ताकद एकदम क्षीण झाली असल्यास त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांना होणार आहे. यामुळे उद्धव गटात काय घडते याकडे अनेकांचे लक्ष आहे.

उद्धव ठाकरे गटाचे लोकसभेतील खासदार

  1. अरविंद सावंत, दक्षिण मुंबई

  2. संजय देशमुख, यवतमाळ – वाशिम

  3. नागेश पाटील – आष्टीकर – हिंगोली

  4. संजय जाधव – परभणी

  5. राजाभाऊ वाजे – नाशिक

  6. संजय दिना पाटील – ईशान्य मुंबई

  7. भाऊसाहेब वाकचौरे – शिर्डी

  8. अनिल देसाई – दक्षिण मध्य मुंबई

  9. ओमप्रकाश राजेनिंबाळकर – धाराशिव (उस्मानाबाद)


उद्धव ठाकरे गटाचे विधानसभेतील आमदार

  1. नितीन देशमुख, बाळापूर

  2. मनोज जामसुतकर, भायखळा

  3. अनंत नर, जोगेश्वरी पूर्व

  4. सिद्धार्थ खरात, मेहकर

  5. अजय चौधरी, शिवडी

  6. आदित्य ठाकरे, वरळी

  7. दिलीप सोपल, बार्शी

  8. गजानन लवाटे, दर्यापूर

  9. भास्कर जाधव, गुहागर

  10. महेश सावंत, माहीम

  11. कैलास घाडगे पाटील, धाराशिव (उस्मानाबाद)

  12. डॉ. राहुल पाटील, परभणी

  13. प्रवीण स्वामी, उमरगा

  14. सुनील राऊत, विक्रोळी

  15. सुनील प्रभू, दिंडोशी

  16. बाबाजी काळे, खेड आळंदी

  17. संजय देरकर, वणी

  18. संजय पोतनीस, कलिना

  19. वरुण सरदेसाई, वांद्रे पूर्व

  20. हारुन खान, वर्सोवा

Comments
Add Comment

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे