मुंबई : जालना जिल्ह्यात वाळू माफिया आणि गुन्हेगारांवर प्रशासनाने तडीपीरीची कारवाई केली आहे. जालना प्रशासनाने नऊ जणांविरोधात कारवाई केली, यामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांचा मेहुणा विलास खेडकर (Vilas Khedkar) याचाही समावेश आहे. तसेच जरांगे यांच्या आंदोलनातील ५ जणांचा समावेश आहेत. या कारवाईवरुन जरांगेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. यानंतर आता पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली.
मनोज जरांगे पाटील यांचे मेहुणे विलास खेडकर यांच्यावरील कारवाई संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, कोणाचा साला आहे, कोणाचा नातेवाईक आहे, यावरून कारवाई होत नसते. जर काही गुन्हे केले असतील तर अटक होत असते. या प्रकरणाची माझ्याकडे माहिती नाही, योग्य ती माहिती घेऊन मी तुम्हाला सांगेन, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.