डॉ भुषण गगराणी यांचा पहिला अर्थसंकल्प
निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला त्रास होणार नाही याची घेतली जाणार काळजी
अर्थसंकल्पाचा आकडा यंदा चार ते साडेचार हजार कोटींनी वाढणार
मुंबई : मुंबई महापालिकेच्या सन २०२५-२६चा अर्थसंकल्प (BMC Budget) मंगळवारी ४ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता महापालिका आयुक्त तथा प्रशासक मांडणार आहेत. महापालिका प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी आगामी सार्वत्रिक निवडणूक पाहता कोणत्याही प्रकारची करवाढ आणि दरवाढ न करणारे अंदाजित अर्थसंकल्प सादर केले होते. त्याचप्रमाणे आगामी सन २०२५-२६चा अर्थसंकल्प हा आगामी सार्वत्रिक निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बनवला गेला आहे. या अर्थसंकल्पात सामान्य जनता प्रभावित होईल अशाप्रकारे कोणतीही करवाढ, दरवाढ तसेच शुल्क वाढ नसेल, असा अंदाज आहे. त्यामुळे या आगामी अर्थसंकल्पाचा आकडा चार ते साडेचार हजार कोटींनी वाढून सुमारे ६४,००० ते ६४,६०० कोटींच्या आसपास असेल असा अंदाज आहे.
आगामी अर्थसंकल्पात जी विद्यमान २ लाख ३४ हजार कोटींची कामे हाती घेण्यात आली आहेत, त्या कामांना कुठेही कात्री न लावता त्या प्रकल्पांसाठी पुरेशी तरतूद करण्यात येणार आहे. महापालिकेचा आर्थिक स्थितीचा विचार करता महापालिकेकडून अर्थसंकल्पाचा आकडा कमी होवून हाती घेतलेल्या प्रकल्पांच्या खर्चाला कात्री लागेल असे बोलले जाते, परंतु प्रत्यक्षात अर्थसंकल्प बनवताना महापालिका आयुक्त तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांनी ही काळजी घेतली असल्याचे कळते. त्यामुळे चालू कामांना खिळ बसणार नाही याची काळजी घेत त्यासाठी पुरेशा निधीची तरतूद करताना कोणत्याही नवीन कामांचा समावेश करून त्यासाठी निधीची तरतूद न करण्यावर प्रशासनाने भर दिला जाण्याचा अंदाज आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नियोजित ४०० कोटींचा विकास आराखडा मंजूर
त्यामुळे भांडवली खर्चाचा आकडा हा चालू अर्थसंकल्पात ३१,७७४.५९ कोटी रुपये एवढा आहे, तो आकडा वाढून आता ३४ हजार कोटींच्या वर जाण्याची शक्यता आहे. तर महसुली खर्चांचा आकडा ही ३० हजारच्या आसपास पोहोचला जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या आर्थिक स्थितीचा विचार करता प्रशासनाकडून महसुली उत्पन्न वाढवण्यावर भर देण्यात येत असून भूखंडांचे लिलाव आणि भाडेकरार न झालेल्या मोकळ्या भूखंडांचे वितरण यातून महापालिकेला, ओटीपी चार्जेस यातून दोन ते अडीच हजार कोटींचा महसूल अपेक्षित आहे. याशिवाय करनिर्धारण व संकलन विभागाच्या माध्यमातून थकबाकीवर जोर देवून महसुल वाढवला जाणार आहे. परवाना विभाग आणि अग्निशमन दल तसेच विकास नियोजन विभागाच्या महसुली उत्पन्न वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे महसुली उत्पन्नाचा आकडा यंदा वाढलेला दिसणार आहे.
महापालिकेचा सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडचे काम जवळपास पूर्ण होत आल्याने यासाठी तीन हजार कोटींची तरतूद, शिवाय रस्ते कामांसाठी चार हजार कोटींची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. तसेच गोरेगाव मुलुंड लिंक रोडचे कामही पुर्णत्वाच्या दिशेने असल्याने तीन ते साडेतीन हजार कोटींच्या आसपास तरतूद करण्याची गरज भासणार आहे. वेस्ट टू एनर्जीचा प्रकल्पही मार्गी लागणार असल्याने यासाठी सध्याच्या ८०० ते १००० कोटी, मिठी नदी प्रकल्पाच्या कामासाठीही सुमारे ८०० कोटी रुपये तरतूद केली जाण्याची शक्यता आहे.
आरोग्य खात्याच्यावतीने मुलुंड एम. टी. अगरवाल रुग्णालय, गोवंडी रुग्णालय, कुपर रुग्णालय, नायर रुग्णालय, वांद्रे भाभा, शीव रुग्णालय आदी रुग्णालयांची कामेही पूर्णत्वास येत असल्याने तसेच केईएम शताब्दी इमारत, शीव रुग्णालय इमारत यांची कामे झाल्याने भरीव निधीची तरतूद करावी लागणार आहे. त्यामुळे आरोग्य खात्याच्या निधीतही वाढ होण्याची शक्यता असून सुमारे तीन ते साडेतीन हजार कोटी रुपयांची तरतूद होण्याची शक्यता आहे.
गोखले पूल, विद्याविहार पूल, मालाड, महालक्ष्मी स्थानक आणि सात रस्ता जंक्शनवरील पूल आदी कामे पूर्णत्वास येत असल्याने यासाठी भरीव तरतूद आणि गोरेगाव खाडीवरील भगतसिंह नगर, दहिसर उन्नत मार्ग, मुलुंड गोरेगाव जोडरस्ता प्रकल्प अंतर्गत सहा पदरी उड्डाणपूल, मच्छिमार नगर येथील हाय वेला जोडले जाणारे पूल, मालाड इन्फिनिटी मॉलच्या मागील बाजुस लागून रोड आणि मालवणी पुलांची कामे सुरु होत असल्याने पुल विभागाच्या बांधकामासाठी सुमारे दीड ते दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे.
मुंबईतील रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे २०२१मध्ये काढलेल्या निविदेतील कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. तसेच सुमारे ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या कामांच्या पहिल्या टप्प्यातील सर्व कामे नवीन आर्थिक वर्षांत पूर्ण होणार असल्याने तसेच दुसऱ्या टप्प्यातील काही कामे पूर्णत्वास येणार असल्याने आगामी अर्थसंकल्पात ४५०० ते ५००० कोटी रुपयांची तरतूद होण्याची शक्यता आहे.
मलनि:सारण प्रचलन आणि प्रकल्पाची कामे युध्दपातळीवर सुरु असल्याने या अंतर्गत मलवाहिनी टाकण्याची कामे तसेच एसटीपी प्रकल्प ही कामे मोठ्याप्रमाणात म्हणज ५००० ते ६००० कोटींची तरतूद करावी लागणार आहे.
पाणी पुरवठा विभागाची अनेक कामे सुरु असल्याने आगामी वर्षात १५०० ते २००० कोटी रुपयांची तरतूद होण्याची शक्यता आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभागाच्यावतीने टप्पा १२ अंतर्गत शौचालयांच्या उभारणीचे काम पूर्ण आल्याने, तसेच आश्रय योजनेअंतर्गत हाती घेतलेली कामे ५० टक्क्यांहून कामे पूर्ण होणार असल्याने तसेच कचरा प्रकल्प राबवण्यासाठीही येत्या वर्षात कामे व योजना राबवल्या जाणार असल्याने सुमारे १२०० ते १५०० कोटी रुपयांची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नियोजन विभागांमार्फत राबवल्या जाणाऱ्या महिलांच्या योजना या जेंडर बजेट अंतर्गत राबवल्या जात असल्या तरी या विभागाच्या खर्चाला कात्री लावली जाणार आहे. तसेच मुंबई अग्निशमन दल, परवाना विभाग, सुरक्षा विभाग, मंडई आणि उद्यान विभाग यांच्यासाठी तरतूद केल्या जाणाऱ्या निधीत कपात केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.