नवी दिल्ली: खो खो विश्वचषक २०२५मध्ये भारतीय महिला संघाने नेपाळला ७८-४० असे हरवत वर्ल्ड चॅम्पियनचा खिताब आपल्या नावे केला आहे. सुरूवातीपासूनच भारताच्या मुलींनी कमालीचे प्रदर्शन केले. फायनल सामन्यात त्यांनी नेपाळला गुडघे टेकायला भाग पाडले आणि भारताचा झेंडा गर्वाने फडकवला. प्रियंगा इंगळेच्या नेतृत्वातील भारतीय संघाने या खेळात इतिहास रचला आहे.
भारताचे जबरदस्त आक्रमण
भारतीय महिला संघ आणि नेपाळच्या संघामध्ये खेळवण्यात आलेल्या फायनल सामन्याच्या स्कोरकार्डवर एक नजर टाकल्यास सुरूवातीपासूनच टीम इंडियाचे आक्रमण जबरदस्त होते. नेपाळच्या कर्णधाराने टॉस जिंकत पहिल्यांदा बचावात्मक भूमिका ङेतली. मात्र त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटला. पहिल्या टर्नममध्ये भारताच्या खेळाडूंनी नेपाळच्या बचावात्मक भूमिकेला हाणून पाडत ३४ गुण मिळवले. भारतीय संघाने नेपाळच्या ६ बॅच बाद केल्या.
दुसऱ्या टर्नमध्ये बचाव करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाचे नेपाळला चांगलेच दमवले. भारतानेही दुसऱ्या टर्नमध्ये बचावातून ड्रीम रनच्या मदतीने १ गुण मिळवला. तर नेपाळच्या आक्रमणाने २२ गुण मिळवले. तिसऱ्या टर्नमध्ये भारताने आक्रमण करताना कमाल केली. त्यांनी नेपाळला सामन्यातूनच बाहेर केले आणि ३८ गुण मिळवले. नेपाळला यावेळी बचाव करताना एकही गुण मिळाला नाही.
नेपाळला संधी नाहीच
अखेरच्या सामन्यातही टीम इंडियाने तेच केले जे त्यांनी पहिल्या सामन्यापासून केले. संपूर्ण सामन्यादरम्यान त्यांनी नेपाळला पुनरागमनाची संधीच दिली नाही आणि विश्वजेता बनले. त्यांनी सलग ६ सामने जिंकत खोखो विश्वचषक २०२५ची ट्रॉफी उचलली.