बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी मुख्य आरोपी कोण आणि त्याला शिक्षा कधी होणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. या घटनेप्रकरणात पोलिसांचा तपास अजूनही सुरु आहे. मात्र असं असलं तरी ज्या टोलनाक्यावरून संतोष देशमुख यांचं अपहरण झालं त्याच टोलनाक्यावरून २८ मे रोजी आवादा कंपनीचे मॅनेजरचे देखील अपहरण झाल्याची धक्कादायक बातमी मिळाली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं ९ डिसेंबर रोजी अपहरण होऊन त्यांची हत्या करण्यात आली. मात्र या हत्येच्या वादाला जिथून सुरुवात झाली त्या आवादा कंपनीच्या मॅनेजरचे २८ मे रोजी अपहरण झाले होते. हे अपहरण आंबेजोगाई रोडवरील टोलनाक्यावरून झाले होते असल्याची माहिती समोर आली आहे.
देशमुखांच्या हत्येआधी नेमकं काय घडलं ??
६ डिसेंबरला आवादा एनर्जी या पवनचक्की प्रकल्पाच्या कार्यालयामध्ये सुदर्शन घुले आणि त्याचे साथीदार हे खंडणी मागण्यासाठी गेले असता तेथील सुरक्षा रक्षक अशोक सोनवणे यांना मारहाण केली. त्यामुळे त्याने मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि त्या ठिकाणी संतोष देशमुख आणि त्यांचे साथीदार भांडण सोडवण्यासाठी गेले. मात्र तिथे परत भांडण वाढले आणि यात दोन गटात भांडण झाले. त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. त्यानंतर ९ डिसेंबरला दुपारी तीन वाजता संतोष देशमुख यांचं टोलनाक्यावरून काळ्या स्कार्पिओ गाडीतून आलेल्या मारेकर्यांनी अपहरण केले. अपहरण झाल्यानंतर संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख याने पोलिसांकडे तक्रार केली असता पोलिसांनी शोध सुरु केला. याच दरम्यान सायंकाळी साडेसहा वाजता संतोष देशमुख यांचा मृतदेह दैठणा फाटा या ठिकाणी सापडला होता. या प्रकरणात ७ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.