Friday, May 9, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

CM Devendra Fadnavis : पानिपत शौर्य स्मारक सुधारणेसाठी महाराष्ट्र सरकार घेणार पुढाकार!

CM Devendra Fadnavis : पानिपत शौर्य स्मारक सुधारणेसाठी महाराष्ट्र सरकार घेणार पुढाकार!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पानिपतमधील शौर्यभूमीला वंदन


पानिपत : मंगल भूमीला वंदन करण्यासाठी येणे हे माझे सौभाग्य मानतो. जेव्हा संधी मिळेल, इथे येत राहीन. आम्ही शौर्य भूमीला वंदन करण्यासाठी आलो. शौर्य भूमीच्या ट्रस्टचे मनापासून आभार मानतो. आमचा इतिहास जिवंत ठेवण्याचे काम त्यांनी केले, याबाबत त्यांचे अभिनंदन करतो. या ठिकाणी मातृभूमीकरिता धारातीर्थी पडलेल्या मराठ्यांच्या शौर्याच संवर्धन करण्याचे काम ट्रस्ट करत आहे. ट्रस्टसोबत माझी चर्चा झाली आहे. येथील स्मारक अधिक चांगल्या पद्धतीने कसे करता येईल, त्यासाठी जे आवश्यक असेल, त्यात महाराष्ट्र सरकार पुढाकार घेईल, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केले आहे.



कौरव–पांडव संगरतांडव द्वापारकाली होय अती। तसे मराठे गिलचे साचे कलित लढले पानपती।। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पानिपत, हरियाणा येथे पानिपत शौर्य स्मारकास भेट दिली. यावेळी त्यांनी स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून शूरवीरांना विनम्र अभिवादन केले आणि आदरांजली वाहिली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पत्रकारांच्या प्रश्नांनाही सविस्तरपणे उत्तरे दिली. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर पानिपतला येणारे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री आहेत.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी भगव्या झेंड्याखाली आम्हाला सर्वांना एकत्र आणले आणि भारताच्या तिरंग्याखाली एकत्र येणे गरजेच आहे. पानिपत ही मराठी माणसाची एक भळभळती जखम आहे. त्याचवेळी पानिपत मराठी माणसाचा अभिमान आहे. ज्या प्रकारे मराठ्यांनी पानिपतच्या युद्धात शौर्य दाखवले, ही मराठ्यांची वीरता आहे, शौर्य आहे. पानिपत एक अशा प्रकारची लढाई आहे, त्यात जरी तांत्रिकदृष्टया पराजय झाला असला, तरी मराठी हरले नाहीत. त्यांनी आपले शौर्य सातत्याने इतके वाढवले की, त्यानंतर भारतावर अशा प्रकारे आक्रमण करण्याची हिंमत कोणाची झाली नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.

Comments
Add Comment