मुंबई : महायुती सरकारचा शपथविधी अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बरं वाटत नसल्याने ते आज दुपारी ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात दाखल झाले. ज्युपिटर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. एकनाथ शिंदे यांचं चेकअप केल्यानंतर ते काही वेळाने रुग्णालयातून बाहेर पडले. यानंतर ते रस्ते मार्गाने मुंबईच्या दिशेला रवाना झाले.
एकनाथ शिंदे यांना ताप आला होता. तसेच त्यांच्या पांढऱ्या पेशी वाढल्याची माहिती आहे. तसेच त्यांच्या घशात संसर्ग झाल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून शिंदे आजारी आहेत. आजारपणामुळे एकनाथ शिंदे हे दरे या त्यांच्या मूळगावी गेले होते तेव्हा त्यांची तब्येत जास्त बिघडली होती. यानंतर ते मुंबईत परतले होते. तरीसुद्धा त्यांची प्रकृती सुधारली नव्हती. त्यानंतर ते ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी आराम करत आहेत. काल रात्री भाजप नेते गिरीश महाजन यांनी एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली. त्यावेळी शिंदे यांना सलाईन लावली होती, अशी माहिती गिरीश महाजनांनी नंतर माध्यमांना दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांची तब्येत अद्यापही ठीक नसल्याची माहिती समोर आली आहे.
PV Sindhu : पी.व्ही. सिंधू चढणार बोहोल्यावर! होणार नवरा आहे तरी कोण ?
एकनाथ शिंदे यांना गेल्या काही दिवसांपासून ताप येत आहे. त्यामुळे त्यांची डेंग्यू आणि मलेरियाची टेस्ट करण्यात आली होती. मात्र, या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. मात्र, पांढऱ्या पेशी कमी जास्त होत असल्याने अजूनही त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सतत येणाऱ्या तापामुळे अँटी बायोटिक औषधे सुरु आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना सध्या अशक्तपणा जाणवत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणं आहे. डॉक्टरांनी एकनाथ शिंदे यांची प्रकृती सुधारत असल्याचेही सांगितले. परंतु, डॉक्टरांनी एकनाथ शिंदे यांना तुर्तास आराम करण्याचा सल्ला दिला आहे. ज्युपिटर रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांकडून एकनाथ शिंदे यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
महायुती सरकारचा ५ डिसेंबरला दुपारी ५ वाजता शपथविधी पार पडणार आहे. त्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी बुधवारी सकाळी एकत्रितपणे आझाद मैदानातील शपथस्थळाची पाहणी केली. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे, संजय शिरसाट, धनंजय मुंडे हे उपस्थित होते. भाजपचे केंद्रीय निरीक्षक आज संध्याकाळी मुंबईत दाखल होणार आहेत. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुढील काही तासांमध्ये मुंबईत पोहोचतील. विजय रुपाणी सायंकाळी ७. ३० वाजता, तर निर्मला सीतारामन रात्री ९. ३० वाजता मुंबईत पोहोचणार आहेत. मुंबईतील ओबेरॉय हॉटेलमध्ये दोघे नेते वास्तव्यास असतील. ४ डिसेंबरला दोन्ही निरीक्षक भाजप आमदारांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत भाजप विधीमंडळ गटनेत्याची निवड होईल.