Tuesday, May 13, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

VHP - गरबा कार्यक्रमात फक्त हिंदूंना प्रवेश द्या

VHP - गरबा कार्यक्रमात फक्त हिंदूंना प्रवेश द्या

कार्यक्रमाला येणाऱ्यांचे आधार कार्ड तपासण्याची मागणी


नागपूर : नवरात्रोत्सवादरम्यान आयोजित होणाऱ्या गरबा नृत्याच्या कार्यक्रमात फक्त हिंदू धर्मीयांना प्रवेश द्या, त्यासाठी आधार कार्ड तपासा, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने गरबा आयोजकांकडे केली आहे. कार्यक्रमस्थळी आधार कार्ड तपासण्यात यावे आणि टिळा लावून प्रवेश देण्यात यावा, मुस्लिमांना प्रवेश देण्यात येवू नये, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र आणि गोवा प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी केली आहे.


यासंदर्भात शेंडे म्हणाले की, कोकण प्रांतात आम्ही पत्रक काढून आवाहन केले. तर इतर प्रांतात वैयक्तिक संपर्क साधून आवाहन करीत आहोत.


एखाद्या आयोजकाकडे मनुष्यबळाची कमतरता असल्यास आणि त्यांनी मागणी केल्यास आम्ही कार्यकर्ते देवू. गरबा हा श्रद्धेचा आणि भक्तीचा विषय असून ते फक्त नृत्य नाही, तो इव्हेंटही नाही, त्यामुळे गरबा आयोजनाच्या स्थळी देवीबद्दल श्रद्धा नसलेल्या, भक्ती नसलेल्यांनी प्रवेशच करू नये. तिथे फक्त हिंदू धर्मीयांनी प्रवेश करावा, अशी मागणी शेंडे यांनी केली आहे.


गरबा उत्सवात श्रद्धा नसताना, देवी बद्दल भक्ती नसतानाही अनेक इतर धर्मीय तिथे प्रवेश घेतात आणि हिंदू महिला आणि तरुणींची छेड काढतात. पुढे लव्ह जिहाद सारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे गरबा आयोजन करणाऱ्या मंडळांनी आधीच काळजी घ्यावी, असे गोविंद शेंडे म्हणाले.


यासोबतच विहिंपने गरबा उत्सव आयोजन करणाऱ्यांना मंडळांना संपर्क साधून तशी व्यवस्था करण्यास सांगितले आहे. गरबा उत्सवात येणाऱ्यांचे आधार कार्ड तपासणे आणि दरावरील व्यवस्थेसाठी आयोजन मंडळांकडे कार्यकर्ते नसल्यास विहिंप आपले कार्यकर्ते मदतीसाठी उपलब्ध करून देणार आहे.


गेल्या काही वर्षांपासून गरबा उत्सवात फक्त हिंदू धर्मीयांनाच प्रवेश देण्यात यावा अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून केली जात आहे. गरब्याच्या कार्यक्रमात इतर धर्मिय लोक प्रवेश करतात आणि त्यामुळे लव्ह जिहाद सारखी प्रकरणे घडतात, असा आरोप हिंदुत्ववादी संघटनांकडून केला जात आहे. यावरून आता दरवर्षी वाद होत आहे. खासकरून गुजरातमध्ये अनेक ठिकाणी गरबा आयोजकांकडून फक्त हिंदूंना या ठिकाणी प्रवेश देण्यात येतो आणि इतर धर्मीयांना विरोध केला जातो. त्यामुळे या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचा आरोपही केला जात आहे.

Comments
Add Comment