मुंबई : गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav) गावी जाण्यासाठी चाकरमान्यांची लगबग असते. मात्र अशातच एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे (ST Worker Strike) हत्यार उपसल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे त्याचबरोबर २०१६ पासूनच्या थकीत महागाई भत्ता, घर भाडे भत्ता नक्कीच, व वार्षिक वेतन वाढ करावी अशा प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर प्रवाशांचे हाल होऊ नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची (Eknath Shinde) कामगार संघटनेसोबत बैठक घेतली जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाची सरकारकडून दखल घेण्यात आली आहे. मंत्री उदय सामंत यांच्याकडून एसटी कामगार संघटनेला चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे. आज किंवा उद्या मुख्यमंत्र्यांची ही बैठक होणार असून यामध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ होऊ शकते किंवा भत्त्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय सरकार घेऊ शकते, अशी शक्यया वर्तवली जात आहे.
कर्मचारी काय म्हणाले?
एसटी कर्मचाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची ७ ऑागस्ट रोजी बैठक झाली होती. त्याच बैठकीत २० ऑगस्ट रोजी बैठकीच्या आयोजनाचे पत्र देण्यात आले होते. मात्र २० तारीख देऊनही बैठक झाली नाही त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका धारण केली. “प्रत्येक वेळी आमची फसवणूक केली जाते, हे कर्मचाऱ्यांना माहिती आहे. एसटी कर्मचाऱ्यांना मुलंबाळं नाहीत का? मी प्रवाशांची माफी मागतो, तुमचे हाल होत आहेत. पण तुम्ही थोडं आमची बाजू बघा, आम्हाला कोण बघणार? मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या तर आम्ही का रस्त्यावर उतरलो असतो?” अशी प्रतिक्रिया संघटनेचे संदीप शिंदे यांनी व्यक्त केली.
दरम्यान, आज दुपारी प्रशासनाने एसटी संघटनांना बैठकीसाठी बोलावले आहे. परंतु एसटी संघटना या बैठकीला जाणार का नाही? याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. तसेच बैठक झाल्यास या बैठकीत सरकार काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.