पुणे : पुरंदर तालुक्यातील जेजुरी (Jejuri) येथे २ सप्टेंबर रोजी होणाऱ्या श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेमुळे वाहतूक कोंडी (Traffic) टाळण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी वाहतुकीत बदल करण्याचे आदेश दिले आहेत.
यात्रेच्या निमित्ताने २ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत पुणे-जेजुरी-बारामती महामार्गावर जड वाहने आणि इतर वाहतुकीस बंदी घालून अन्य पर्यायी मार्ग वापरण्याचा निर्णय घेतला आहे. सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथून पुण्याकडे जाणारी जड वाहतूक पूर्णपणे बंद केली जाईल आणि नीरा-मोरगाव-सुपा ते केडगाव चौफुला मार्गे सोलापूर महामार्गाने पुण्याकडे वळवली जाईल. पुण्याकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद केली जाईल.
बेलसर-कोथळे-नाझरे-सुपे-मोरगाव मार्गे बारामती, फलटण आणि साताराकडे वाहने वळवली जातील.२ सप्टेंबर रोजीच्या श्री खंडोबा देवाची सोमवती यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी वाहतुकीचे निर्बंध शिथिल राहतील. नागरिकांनी या बदलांची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.