खासदार रविंद्र वायकर यांची मागणी
नवी मुंबई : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील विमानतळ विकासासंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट्स सांगितले. त्यामध्ये नवी मुंबई येथे विमानतळ उभारण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार मुंबई विमानतळावरील विमानांचा ताण कमी करण्यासाठी नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (Navi Mumbai International Airport) बांधकाम सुरु करण्यात आले. दरम्यान, सध्या हे बांधकाम प्रगतीपथावर सुरु असून याबाबत नवीन अपडेट्स समोर येत आहेत. त्यातच खासदार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावाबाबत मागणी केली असल्याची माहिती मिळत आहे.
खासदार रवींद्र वायकर यांनी नवी मुंबईतील विमानतळाला ‘दी.बा.पाटील’ नाव देण्याची मागणी केली आहे. या विमानतळाचे काम कधी पूर्ण होणार याबाबतची स्पष्टता अद्यापही मिळाली नाही. मात्र नागरिकांच्या मागणीनुसार या विमानतळाला दि. बा. पाटील नाव देण्याचा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्र सरकारकडे पाठवला आहे, तो मंजूर करून विमानतळाला दि .बा.पाटील नाव देण्यात यावे, अशी मागणी केली. तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळाच्या विकासासाठी प्राधान्य द्यावे, अशी विनंती देखील वायकर यांनी केली आहे.
दरम्यान, या विमानतळाचा पहिला टप्पा डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्धिष्ट असून त्याचा व्यावसायिक वापर मार्च २०२५ पासून होण्याच्या तयारीत आहे. तर २०४० पर्यंत या विमानतळाचे पाचही टप्पे कार्यान्वित होतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.