राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील (Nashik News) शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत (PM Fasal Bima Yojana) सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना येत्या काही दिवसांत विमा रक्कम जमा होणार असल्याची घोषणा केली. या पिकविमा संदर्भात मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादाजी भुसे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात येणार असून त्याआधारे योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याचे राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी म्हटले.
मिळालेल्या माहितीनुसार, काल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा नाशिक जिल्ह्यात आली होती. यावेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी नाशिक जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी तसेच शेतकऱ्यांसमवेत चर्चा केली. त्यांनंतर शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या विम्याच्या प्रश्नामुळे आज सकाळी धनंजय मुंडे यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोनवणे व इतर अधिकारी यांच्या सोबत बैठक घेऊन जिल्ह्यातील सर्व परिस्थितीची माहिती घेतली. त्यानुसार नाशिकमधील जवळपास ६ लाख शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी देण्यात येणारे ८५३ कोटी रुपये ३१ऑगस्ट पूर्वी मिळणार असल्याची घोषणा धनंजय मुंडे यांनी केली.
दरम्यान, गत वर्षी नाशिकमधील सुमारे ५ लाख ८८ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता. त्याअंतर्गत शेतकऱ्यांना ७९ कोटी रुपयांचा लाभ मिळाला होता. त्यानंतर आज कृषीमंत्री मुंडे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे यंदा शेतकऱ्यांना ८५३ कोटी रुपये मिळणार आहेत.