करणार ‘या’ उपाययोजना
मुंबई : बांगलादेशात सध्या मोठी खळबळ (Bangladesh violence) माजली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आंदोलक प्रचंड हिंसक झाले असून त्यांनी राजीनामा देऊन देश सोडून गेलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांचं शासकीय निवासस्थान लुटलं आहे. एवढंच नव्हे तर हल्लेखोर लाठ्या घेऊन थेट तुरुंगातही घुसले आणि त्यांनी कैद्यांना बाहेर काढलं. यामुळे सुमारे ५०० कैदी तुरुंगातून पसार झाले आहेत. यात दहशतवाद्यांचाही समावेश असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि मायदेशात त्यांच्या परतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी महत्वाची पावले उचलली आहेत.
बांगलादेशातील अशांततेमुळे परदेशी नागरिकांच्या, विशेषतः अशांत भागात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी तिथे शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्राधान्य दिले आहे.
या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री शिंदे अथक प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क देखील साधला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाशी संवाद
मुख्यमंत्री शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संवाद साधत प्रभावित विद्यार्थ्यांना सर्व शक्य मदत करण्याची विनंती केली आहे. त्यांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवणे तसेच भारतात परत येण्यासाठी लवकरात लवकर व्यवस्था करण्याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी चर्चा केली आहे.
कोणत्या उपाय योजना करणार?
तातडीने मदत उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने बांगलादेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती मिळवून आणि त्यांची यादी संकलित करून परराष्ट्र मंत्रालयाला उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना त्वरित संपर्क साधून मदत करणे शक्य होणार आहे. तेथील परिस्थितीवर लक्ष ठेवणे आणि केंद्रीय अधिकारी आणि प्रभावित कुटुंबांशी संपर्क ठेवण्यासाठी राज्य शासनामार्फत एक पथकही स्थापन करण्यात आले आहे. बांगलादेशातील भारतीय दूतावासाशी समन्वयाने काम करण्यात येत आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करता येतील.
काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यांचे मायदेशात परतण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. या आव्हानात्मक काळात राज्य सरकार बाधित विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांसमवेत सक्षमपणे उभे आहे.