मुंबई : मराठी वाहिन्यांवरील कॉमेडी शो (Marathi comedy show) प्रेक्षक आवडीने पाहतात. मात्र, हल्लीच्या काळात सर्वच वाहन्यांवर आलेल्या नवनव्या कॉमेडी शोजमध्ये टीआरपीसाठी (TRP) चढाओढ सुरु झाली आहे. त्यात प्रेक्षक टिकवून ठेवण्यासाठी प्रचंड कसरत करावी लागत आहे. कलर्स मराठी वाहिनीने (Colors marathi) देखील या स्पर्धेत उतरुन टॉपच्या विनोदी कलाकारांची निवड करत नवा कॉमेडी शो ‘हसताय ना हसायलाच पाहिजे’ (Hastay na hasaylach pahije) प्रेक्षकांच्या भेटीला आणला. या कार्यक्रमातून निलेश साबळे (Nilesh Sable), भाऊ कदम (Bhau Kadam) आणि ओंकार भोजने (Onkar Bhojane) हे कलाकार प्रेक्षकांना हसवत होते. मात्र, आता अवघ्या तीन महिन्यांतच हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
निलेश साबळे सूत्रसंचालन करत असलेल्या आणि अनेक तगड्या मराठी विनोदवीरांची फौज असलेल्या ‘चला हवा येऊ द्या’ या कॉमेडी शोने एक काळ गाजवला होता. मात्र, नंतरच्या काळात त्याला उतरती कळा लागली. हा शो बंद झाला आणि काही दिवसांतच कलर्स मराठीवर त्याच धाटणीचा ‘हसताय ना हसायलाच पाहिजे’ हा शो सुरु झाला. सुरुवातीला फारसं नावीन्य नसल्याने प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला तितकीशी पसंती दाखवली नाही. मात्र, हल्ली हळूहळू प्रेक्षकसंख्येत वाढ होऊ लागली होती. असं असतानाही अपेक्षित टीआरपी न मिळाल्यामुळे तसेच बिग बॉसचा पाचवा सीझन सुरु (Bigg Boss marathi season 5) होत असल्यामुळे हा कार्यक्रम अवघ्या तीन महिन्यांतच बंद होणार आहे.
हसताय ना हसायलाच पाहिजे हा कार्यक्रम २४ एप्रिल रोजी सुरु झाला होता. या कार्यक्रमाचं हे पहिलं पर्व होतं आणि लवकरच दुसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येईल असंही सांगितलं जात आहे. ‘बिग बॉस मराठी ५’ संपल्यानंतर पुन्हा एकदा नव्या जोमाने या कार्यक्रमाचं दुसरं पर्व सुरू करण्यात येणार आहे. मात्र आता हा कार्यक्रम लवकर बंद केल्याने चाहतेही वाहिनीवर नाराज आहेत. कार्यक्रमाला किमान थोडा वेळ मिळायला हवा होता असं काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे प्रेक्षक ‘बिग बॉस मराठी ५’ साठी उत्सुक आहेत.