नागपूर : राज्यातील देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) सरकारच्या काळात भाजपा नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला होता. सुधीर मुनगंटीवार यांनी ३३ कोटी वृक्षलागवडीची महत्त्वाकांक्षी मोहिमेची घोषणा केली होती. मात्र या मोहिमेत गैरव्यवहार झाल्याचा (Tree Planting Campaign Scam) आरोप माविआच्या नेत्यांनी केला होता. मात्र या प्रकरणी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना ‘क्लीन चीट’ देण्यात आली आहे. या प्रकरणाबाबत समितीने दिलेल्या अहवालानुसार मुनगंटीवार यांनी कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार केला नसल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना या प्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळातील वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ३३ कोटी वृक्षलागवड या महत्त्वाकांक्षी मोहिमेची घोषणा केली होती. मात्र त्यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावर आक्षेप घेऊन मुनगंटीवारांवर आरोप केला होता. त्या प्रकरणाबाबत सखोल चौकशीसाठी समिती नेमण्यात आली होती. त्यानंतर समितीने केलेल्या चौकशीनुसार मुनगंटीवार यांच्याकडून कुठलीही अनियमितता किंवा गैरव्यवहार झाला नसल्याचे सिद्ध झाले आहे. त्यासोबतच राज्यात ही मोहिम यशस्वी झाल्याचेही समितीने सांगितले आहे. त्यामुळे समितीकडून मविआने केलेले आरोप फेटाळून सुधीर मुनगंटीवारांना क्लीन चीट देण्यात आली आहे.
समितीच्या अहवालात काय म्हटले?
- या प्रकरणात सखोल चौकशी केली असता कुठलिही अनियमितता किंवा गैरव्यवहार झालेला नसल्याचे आढळून आले आहे.
- राज्यात मोहिम यशस्वी झाल्याचे समितीचे स्पष्ट मत आहे.
- मोहिम राबवताना काही अडचणी आणि त्रुटी राहिल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
- त्रुटी आणि अडचणी दूर करण्यासाठी सुधारणा करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
- लहान रोपट्यांऐवजी मोठी रोपटी लावण्याची यात शिफारस करण्यात आली आहे.
- या मोहिमेमुळे राज्यात ५२ कोटी वृक्ष लागल्याची जमेची बाजू मांडण्यात आली आहे.
- खाणींच्या परिसरात झाडे लावण्याची शिफारसही समितीने या अहवालात केली आहे.