मुंबई : मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच जोरदार पाऊस (Rain in Mumbai) कोसळत आहे. यामुळे मुंबईच्या अनेक सकल भागात पाणी साचले आहे. मुसळधार पावसाचा परिणाम मुंबईतील लोकल सेवेवर (Mumbai Local Train) देखील झाला आहे.
पावसामुळे हार्बर रेल्वे लाईन विस्कळीत झाली आहे. पनवेल ते वाशीपर्यंतच मार्ग सुरु आहे. तर वाशीपासून सीएसएमटीला येणारी लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे.
चुनाभट्टी स्थानकात पाणी अजूनही असल्याने सीएसएमटी ते वाशी लोकल रद्द आहेत. तर ट्रान्स हार्बर लाईन पंधरा मिनिटे उशिराने सुरु आहे.
सीएसएमटी ते ठाणे दरम्यान जलद मार्गिका बंद असल्याने धीम्या मार्गिकेवर मुंबईच्या दिशेने जाणा-या लोकल एकापाठोपाठ रुळांवर उभ्या आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेवरील स्थानकांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. तर पश्चिम रेल्वेवरील लोकल १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहे.
दक्षिण मुंबईतील सायन, हिंदमाता, परळ या भागांमध्ये पाणी साचले आहे. तसेच उपनगरात असल्फा, साकीनाका, जेबी नगर, विक्रोळी, घाटकोपर, चकाला, अंधेरी, मालाड, कांदिवली या परिसरातही सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. यामुळे वाहतुकीचा वेग मंदावल्याने मुंबईतल्या बहुतेक सर्व रस्त्यांवर ट्रॅफिक जॅम झाले आहे.
पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबईतील रस्त्यांवर पाणी साचून चक्काजाम होण्याची दाट शक्यता आहे. पालघर, ठाण्यातही आज पहाटेपासून जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचले आहे.
या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांच्या पहिल्या सत्रासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन दुपारच्या सत्रातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी द्यायची की नाही या संदर्भात निर्णय घेतला जाईल, असे मुंबई महानगरपालिका प्रशासनकडून सांगण्यात येत आहे.