
हवामान विभागाने दिला अतिवृष्टीचा इशारा
मुंबई : महाराष्ट्रासह (Maharashtra Rain) संपूर्ण देशभरात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. राज्यातील ठिकठिकाणी पावसाच्या सरी बरसत आहेत. मुंबईत पावसाची ये-जा व उष्णतेची लाट असे बदलते वातावरण सुरु असले तरीही राज्यात अनेक भागात पाऊसपाणी होत असल्याचे चित्र दिसून येते. राज्यभरात पाऊस धुमाकूळ घालत असताना हवामान विभागाने (IMD) पाऊस संदर्भात महत्त्वाची अपडेट (Weather Update) जारी केली आहे. हवामान विभागाकडून महाराष्ट्रासह काही राज्यांना पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा (Heavy Rain Alert) इशारा देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यंदा राज्यात मान्सून वेळेआधीच दाखल झाल्यामुळे यावेळी मान्सूनची वाटचाल वेगाने सुरु असल्याचे दिसून येत आहे. अशातच हवामान विभागाने पुढील तीन दिवस काही जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे. विभागाने काही भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून रेड अलर्ट जारी केला आहे. त्यासोबत येत्या २४ तासांतही अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागाने २४ तासांत विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यासोबत उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाचा इशारा दिला आहे. तर कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
देशातील 'या' भागात अतिवृष्टीचा इशारा
हवामान विभागाने अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय, पश्चिम बंगाल, सिक्कीम, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि किनारपट्टीवरील भागात अतिवृष्टीचा अंदाज दिला असून पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी आहे. त्याचबरोबर काही भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय ५ आणि ६ जुलै रोजी अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसासह रेड अलर्ट जारी केला आहे.