Pune crime : पुण्यात चाललंय काय? दारूसाठी पैसे न दिल्याने नशेखोरांनी केली वृद्धाची हत्या

आरोपींमध्ये यापूर्वीही हत्येचा गुन्हा दाखल असलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा समावेश


पुणे : पुण्यातील गुन्हेगारी (Pune crime) दिवसेंदिवस वाढतच चालली असून अनेक चित्रविचित्र घटना समोर येत आहेत. कधी खून, कधी अपघात, कधी गोळीबार तर कधी कोयता गँगची दहशत या घटनांमुळे विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्याला कलंक लागला आहे. त्यातच आता पुण्याच्या उच्चभ्रू औंध (Aundh) परिसरातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. दारुसाठी पैसे मागितले असता ते न दिल्याने नशेखोर (Drunkards) तरुणांच्या एका टोळक्याने निष्पाप वृद्धाची डोक्यात रॉड घालून हत्या (Murder) केली. या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.


समीर रॉय चौधरी (Sameer Roy Choudhury) असं हत्या झालेल्या ७७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचं नाव असून ते टाटा कंपनीतून सेवानिवृत्त झाल्यावर पुण्यातील औंध भागात स्थायिक झाले होते. गुरुवारी पहाटे सव्वापाच वाजता ते मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडले आणि परिहार चौकालगत असलेल्या फुटपाथवरून निघाले. त्यावेळी रात्रभर दारु पार्टी केलेल्या चार जणांची टोळी बाहेर पडली होती. या टोळीला आणखी दारू हवी होती आणि त्यासाठी पैसे हवे होते. त्यासाठी या टोळीने मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या व्यक्तींवर हल्ले सुरु केले.


दोन व्यक्तींवर हल्ला केल्यावर या टोळीने समीर रॉय चौधरी यांना गाठले. टोळीने त्यांच्याकडे दारुसाठी पैशांची मागणी केली. मात्र, त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे वैतागलेल्या टोळीने समीर रॉय चौधरी यांच्या डोक्यात लोखंडी रॉड घातला. यामध्ये समीर रॉय चौधरी गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान काल रात्री त्यांचा मृत्यू झाला.



आणखी दोघांवर केला होता हल्ला


या प्रकरणी श्रेयस सतीश शेट्टी (वय ३०, रा. अश्विनी सोसायटी, औंध रस्ता, खडकी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी शेट्टी हे गुरुवारी पहाटे सव्वापाच वाजता सायकलवरून मोबाईल शॉपी रस्त्यावरून जात होते. मोबाईल शॉपीजवळ चार जण घोळक्याने उभे होते. त्यांच्याकडे एक दुचाकी होती. त्यांनी फिर्यादी शेट्टी यांना अडवित पैशांची मागणी केली. त्यांनी आपल्याजवळ पैसे नाहीत असे सांगितले. मात्र, आरोपींनी त्यांच्या खिशात हात घालून पैसे जबरदस्तीने काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दुसऱ्या चोरट्याने त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला. मात्र, शेट्टी यांनी हा वार चुकवला. ते तेथून जीव वाचवून ते पळून जाण्यात यशस्वी ठरले. रामसोबीतकुमार ठक्कु मंडल (वय ३८, रा. मंगलम कन्स्ट्रक्शन साईट, परिहार चौक, औंध) यांच्यावरही या टोळक्याने हल्ला केला असून ते गंभीर जखमी आहेत.



आरोपींमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश


पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे त्यातील तीन आरोपी हे अल्पवयीन आहेत. त्यापैकी दोन अल्पवयीन आरोपींवर आधीच हत्येचा गुन्हा दाखल असून मागील आठवड्यातच ज्युवेनाईल कोर्टाने त्यांची बाल निरीक्षण गृहातून जामिनावर सुटका केली होती. तर यांतील मोठ्या जय सुनील बेंगट (वय १९, रा. कस्तुरबा गांधी वसाहत, औंध) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला १८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलांच्या हातून घडणाऱ्या गुन्ह्यांना रोखण्याचे कायदेशीर आव्हान पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.


Comments
Add Comment

निवडणुकीच्या धामधुमीत जळगावात गोळीबार!

निवडणुकीशी संबंध नसल्याचे पोलिसांचे स्पष्टीकरण जळगाव : जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात असलेल्या आनंद मंगल

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह