Thursday, July 3, 2025

Fake Documents : शासनाच्या कौशल्य विकास केंद्रात विद्यार्थ्यांना पकडले रंगेहाथ

Fake Documents : शासनाच्या कौशल्य विकास केंद्रात विद्यार्थ्यांना पकडले रंगेहाथ

बोगस आधारकार्ड, कागदपत्रं बनविण्याचा प्रकार उघडकीस


रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाव्दारे रत्नागिरीत सुरू असलेल्या कौशल्य विकास केंद्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे कागदपत्रे घेऊन खोटे प्रवेश दाखविण्याचे काम सुरू आहे. तसेच या विद्यार्थ्यांच्या जागी बनावटी विद्यार्थ्यांचे कागदपत्रे बनवून परीक्षा देण्यासाठी त्या बोगस विद्यार्थ्यांच्या जागी बोगस विद्यार्थ्याना बसविण्यात येते त्यासाठी बोगस आधारकार्ड, कागदपत्रे बनविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.


अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने हा प्रकार उघडकीस आणला आहे. गेल्या काही दिवसांपासून एवढ्या मोठ्या प्रमाणावर घोटाळा सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. दि. २५ मे २०२३ साली या कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले होते. या केंद्राला दि. २५ मे २०२४ साली वर्ष पूर्ण झाले आहे. वर्षभरात ६०० विद्यार्थी प्रशिक्षित होवून बाहेर पडले असल्याचे केंद्रातर्फे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्ष किती विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले तर किती बोगस विद्यार्थी होते हा प्रश्न अनुत्तरीत आहे.


शहरातील हॉटेल व्यावसायिकांकडेही केंद्रातर्फे संपर्क साधून अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांना सेमी प्रशिक्षित करण्यासाठी नावनोंदणीचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार हॉटेल व्यावसायिकांनीही कर्मचाऱ्यांची नावनोंदणी करून आधारकार्ड जमा केली होती. संबंधित हॉटेल व्यावसायिकांनी नोंदणी केलेल्या एकाही विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले गेलेले नसल्याचे सांगण्यात आले. तर या विद्यार्थ्यांच्या आधारकार्डचा गैरवापर झाला असल्याचे समजते.



आधारकार्ड बनावट


अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची सदस्य असलेली एक विद्यार्थिनी या केंद्राची माजी विद्यार्थिनी राहिली आहे. तिला बोलावून बनावट आधारकार्ड व नावावर परीक्षा देण्याचे सांगण्यात आले, त्यावेळी तिने धाडस दाखवून हा प्रकार उघडकीस आणला आहे. अनेक विद्यार्थी, कर्मचाऱ्यांचे फोटो घेवून बनावट नावाची आधारकार्ड तयार करून त्यांना परीक्षा देण्यास भाग पाडण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या घोटाळ्यात फार मोठी साखळी असण्याची शक्यता आहे. एका विद्यार्थ्यामागे कौशल्य विकास केंद्राला शासनाकडून पैसा येतो. शासनाकडून येणारा भरमसाठ निधी उकळण्याचा प्रकार असून कोट्यावधी रूपयांचा घोटाळा झाला असण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा