पायात जोडवी, हातात बांगड्या अन् अर्धवट जळालेले…
नांदेड : काही दिवसांपूर्वी वाशिम जिल्ह्यातील काटेपूर्णा जंगलात एक विचित्र अवस्थेतील मृतदेह आढळला होता. ते प्रकरण ज्वलंत असतानाच माहूर तालुक्यात अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. माहूर ते किनवट या राष्ट्रीय महामार्गावरील एका शेतात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला आहे. हिवळणी येथील तुलसीराम राठोड यांच्या शेताच्या बांधावर हा मृतदेह आढळला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
काल रात्री नांदेड जिल्ह्यातील हिळवणी येथील एका शेतकऱ्याच्या शेतात एका अज्ञात महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. शेतातील लाकूडफाटा घेऊन हा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. माहूर -किनवट या राष्ट्रीय महामार्गाजवळ तुळशीराम राठोड यांचे शेत आहे. या शेतात रात्री मोठ्या प्रमाणात आग दिसल्याने राठोड हे शेताकडे आले. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. सर्व आग विझल्यावर त्या ठिकाणी अज्ञात महिला जळालेल्या अवस्थेत दिसल्याने त्यांनी माहूर पोलीसांना माहिती दिली.
घात की अपघात
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर पोलिसांनी धाव घेत घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेच्या हातात बांगड्या आणि पायात जोडवे दिसून आले आहेत. या व्यतिरिक्त तिची ओळख पटण्यासारखा कुठलाही पुरावा आढळून आला नाही. तर या महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलीस तपास करीत आहेत.
दरम्यान, हिळवणी गावात सध्या तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर हा घातपात होता की आत्महत्या याचा पोलीस कडक तपास करत आहेत.