शुद्ध वातावरण व पवित्र आचरण

  31

अध्यात्म - ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज


आपल्या घरातले वातावरण शुद्ध, शांत आणि पवित्र असावे. आपल्याकडे येणाऱ्या माणसाला परत जाऊच नये असे वाटावे. अगदी भगवंताच्या इच्छेने प्रपंच चालला आहे असे समजून, त्या प्रपंचात विद्या, वैभव, घरदार इ. सर्व काही यश संपादन करा. अगदी एखाद्या राजयोग्याप्रमाणे प्रपंचात ऐषआरामात राहून ; पण हे करीत असताना, तुमचे अंत:करण मात्र भगवंताच्या प्रेमाने ओथंबलेले राहू द्या. कोणाशी वाद घालत बसू नका.


जगाचा मान फार घातक आहे, त्याची चटक लागली की, मनुष्य त्याच्यामागे लागतो, नंतर मान मिळविण्याची कृती थांबते आणि मानही नाहीसा होतो. जगातले अजिंक्य पुरूषसुद्धा कुठे तरी विषयात गुंतलेले असतात, तिथे त्यांचा घात होतो. जगाला ते भारी असतील; पण त्या विषयापुढे त्यांचे काहीच चालत नाही. प्रेमात गुंतू नका, तसे द्वेषमत्सरातही गुंतू नका, दोन्ही सारखेच घातक आहेत. आपला प्रिय नातेवाइक मेला आणि आपण ज्याच्यावर दावा लावला आहे, तो भाऊबंद मेला, दोघेही मेल्याचे सूतकसारखेच! त्याचप्रमाणे मनुष्य प्रेमाने गुंतला काय आणि द्वेषाने गुंतला काय, नुकसान सारखेच होते. भगवंताचा विसर हा कोणत्याही कारणाने झाला तरी बरा नाही. मग प्रपंचात सुखसोयी असल्याने तो होवो किंवा प्रपंचात दु:ख झाल्यामुळे होवो.


ढोंग, बुवाबाजी इ.च्या भानगडीत तुम्ही पडू नका. अगदी काहीही न केलेत तरी चालेल; पण ढोंग मुळीच करू नका आणि सर्वांनी माझ्यावर कृपा करा, अगदी अनुभवाने मी सांगतो की, बुवा होण्याच्या फंदात तुम्ही पडू नका. आपले कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करून, त्याचे अनुसंधान अखंड टिकू द्या. आमची अशी वृत्ती बनण्यासाठी संतांच्या संगतीची आपल्याला जरुरी आहे. आपण सर्व जण सत्संगतीमध्ये आहोत असे म्हणतो. मग आमची वृत्ती का न सुधारावी? तर संतांना ज्याची आवड आहे, ते आम्ही धरले नाही म्हणून आमची वृत्ती सुधारत नाही.


श्रीकृष्णाने उद्धवाला ज्ञान देऊन, त्याला गोपींकडे पाठविले. भगवंताच्या नामामध्ये त्या रंगून गेल्या होत्या. गोपींचे नामावरचे प्रेम पाहून, उद्धवाला आश्चर्य वाटले. नामामध्ये त्यांना भगवंत दिसत असे; ते पाहून उद्धवाने देवाला सांगितले, “ देवा, तू मला ज्ञान दिलेस खरे, पण तुझ्या भक्तीचे प्रेम त्याहून श्रेष्ठ आहे, ते तू मला दे. ” खरोखर त्या नामाचे माहात्म्य देवाच्या वर्णनापेक्षाही कठीण आहे. तुम्ही सर्व जण इथे आला आहात. इथून रामाजवळून काही मागून न्यायचेच असेल, तर त्या नामाचे प्रेम तुम्ही सर्वांनी मागा. सर्वांनी नामस्मरण करा आणि आनंदात राहा. राम कृपा करील, हा भरवसा बाळगा.


तात्पर्य : आपल्या जीवनात सहजता हवी. सहजतेमध्ये समाधान आहे.


Comments
Add Comment

Astrology: ज्या लोकांच्या नशीबात असतो खूप पैसा, त्यांच्यामध्ये दिसतात ही लक्षणे

मुंबई: हस्तरेषा शास्त्र हे व्यक्तीच्या हातावरील रेषा पाहून त्याचे भविष्य आणि नशीबाबाबत सांगितले जाते. दरम्यान,

नित्यनेम म्हणजे काय ?

अध्यात्म: ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज नित्यनेम म्हणजे काय ? नित्याचा जो नियम तो खरा नित्यनेम होय. नित्य

स्तुती: जीवन संगीत

सद्गुरू वामनराव पै आपल्या जीवनांत परमेश्वराचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. तो आहे म्हणून सर्व चाललेले आहे. तो नाही

पर्णी अलग त्याचा सूर

ऋतुराज : ऋतुजा केळकर ‘ज्ञानान्वितेषु युक्तेषु शास्त्रज्ञेषु कृतात्मसु। न तेषु सज्जते स्नेहः

काय भुललासी वरलीया अंगा !

मनाचा गाभारा: अर्चना सरोदे ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा !! काय भुललासी वरलीया अंगा !! संत चोखोबा मेळा महाराज यांच्या

ब्रह्मर्षी अंगिरस

भारतीय ऋषी: अनुराधा कुलकर्णी आपल्या कौटुंबिक जीवनात जसे आपल्या आजोबांचे मानाचे, जिव्हाळ्याचे स्थान असते, तसेच