
हिंगोली: राज्यातील हिंगोली जिल्ह्यात गुरूवारी एकामागोमाग एक असे भूकंपाचे दोन जोरदार झटके बसले. हे झटके १० मिनिटांच्या अंतरांनी बसले.
हिंगोलीत सकाळी ६ वाजून ८ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. याती तीव्रता ४.५ रिश्टर स्केल इतकी होती. तर सकाळी ६ वाजून १९ मिनिटांनी भूकंपाचा दुसरा धक्का जाणवला. याची तीव्रता ३.६ रिश्टर स्केल इतकी होती.
भूकंपाच्या धक्क्यांनी तेथील लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकामागोमाग बसलेल्या दोन झटक्यामुळे तेथील लोक तातडीने घराच्या बाहेर आले.
अरूणाचल प्रदेशातही भूकंपाचे धक्के
देशातील पूर्वोत्तर राज्य अरूणाचलमध्येही भूकंपाचे झटके जाणवले. याची तीव्रता ३.७ रिश्टर स्केल इतकी होती. दरम्यान, या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याची माहिती नाही.
कसा येतो भूकंप?
भूकंप कसा येतो हे समजण्यासाठी आपल्या वैज्ञानिक पद्धतीने आधी पृ्थ्वीची संरचना जाणून घ्यावी लागेल. पृथ्वी टॅक्टोनिक प्लेट्सवर आहे. त्याच्याखाली तरल पदार्थ आहे आणि त्यावर या प्लेट्स तरंगत असतात. अनेकदा या प्लेट्स एकमेकांना आदळतात. सातत्याने या प्लेट्स आदळल्याने त्यांचे कोपरे दुमडले जातात आणि दबाव पडल्याने या प्लेट्स तुटू लागतात. अशातच या प्लेट्सच्या खालून निघालेली उर्जा बाहेरच्या दिशेने निघण्याचा प्रयत्न करते. मात्र जेव्हा यात अडथळा येतो त्यानंतर भूकंप येतात.