
आमदार नितेश राणेंचा मनोज जरांगेना इशारा
मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) समाधानी नसून आज त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर आज त्यांनी अत्यंत गंभीर आरोप केले. त्यांनी फडणवीसांना सागर बंगल्यावर येण्याची धमकी दिली. शिवाय माझा बळी सागर बंगल्यावर घ्या, असंही जरांगे म्हणाले. यावर भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मनोज जरांगेंना धमकीवजा इशारा दिला आहे. 'जरांगे-पाटलांनी राजकारण केलं आणि आमच्या नेतृत्वाला धमक्या दिल्या, तर सागर बंगल्याची भिंत ओलांडणं अवघड जाईल', असं नितेश राणे म्हणाले.
नितेश राणे म्हणाले, "जरांगे-पाटलांचा लढा आरक्षणासाठी आहे की फडणवीसांना लक्ष्य करण्यासाठी? त्यांना मराठा समाजाचे प्रश्न सोडवायचे आहेत की फडणवीस यांच्या नावाने राजकारण करायचं आहे? जरांगे-पाटील वाचून दाखवत असलेली स्क्रिप्ट कुणी लिहिली आहे? कारण, या स्क्रिप्टवरून मला तुतारीचा वास येत आहे. हा लढा मराठा समाजासाठी असेल, तर समाजापुरताच मर्यादित ठेवावा. जरांगे-पाटलांनी राजकारण केलं, आमच्या नेतृत्वाला धमक्या दिल्या, तर सागर बंगल्याची भिंत ओलांडणं अवघड जाईल", असा इशारा नितेश राणे यांनी दिला.
पुढे नितेश राणे म्हणाले, "मराठा समाजाला १० टक्के आरक्षण मिळालं आहे. आता कोर्टात जी लढाई लढली जाणार आहे. त्यासाठी सर्वात मोठा आधार देवेंद्र फडणवीस यांचा मिळणार आहे. आमच्या सरकारने दिलेलं आरक्षण मराठा समाजाने स्वीकारलं आहे. जरांगे-पाटलांचं समाधान होत नसल्याने ते फडणवीसांवर टीका करत आहेत. मनोज जरांगे सागर बंगल्यावर येणार तर आम्ही काय गप्प बसणार का? आम्ही मराठेही येथे उभे आहोत,"
राजकारण करु नका. सगेसोयऱ्यांची मागणी आहे तर त्यावर मार्ग निघेल पण उठ सुठ फडणवीसांवर टीका करता, धमक्या देता, तर सागर बंगल्याआधी आमची भिंत आहे, आधी ती क्रॉस करुन दाखवा, मग पुढचं पुढे बघू, असा इशारा देखील नितेश राणे यांनी दिला.
मनोज जरांगे यांनी काय आरोप केले?
मनोज जरांगे यांनी आजच्या बैठकीत फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. मराठा समाजाला ओबीसमधून आरक्षण मिळू नयेत यासाठी फडणवीस यांच्याकडून षडयंत्र सुरु आहे. त्यांच्याकडून मला फसवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. माझा बळी घायचा असेल तर मी स्वतःच फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जातो. फडणवीस यांना आयुष्यातून उठवून टाकील असंही जरांगे म्हणाले आहेत. विशेष म्हणजे व्यासपीठावरून उठून जरांगे थेट मुंबईच्या दिशेने निघाले. जमलेल्या मराठा समाजाने त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते शांत होत नव्हते आणि एकच गोंधळ उडाला.