शिवजयंतीचं निमित्त साधत प्रेक्षकांची चित्रपटगृहात गर्दी
मुंबई : दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) या मराठी दिग्दर्शकाने शिवराज अष्टकातून (Shivraj Ashtak) छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) इतिहास लोकांसमोर मांडण्याचं शिवधनुष्य हाती घेतलं आहे आणि हे काम तो अत्यंत जबाबदारीने आणि यशस्वीपणे पार पाडत आहे. त्याने शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर प्रेक्षकांच्या भेटीला आणलेले पाचही चित्रपट सुपरहिट ठरले. नुकताच १६ फेब्रुवारीला त्याचा ‘शिवरायांचा छावा’ (Shivrayancha Chhava) हा सहावा संभाजी महाराजांच्या (Sambhaji Maharaj) आयुष्यावरील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि या चित्रपटालाही प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.
शिवाजी महाराजांची ३५० वी जयंती काल महाराष्ट्रासह संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याचा चित्रपटालाही मोठा फायदा झाल्याचे दिसून येत आहे. प्रदर्शनाच्या चार दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ५.१२ कोटींची कमाई केली आहे.
शिवजयंतीनिमित्त पुणे सिटी प्राईड येथे ‘शिवरायांचा छावा’ या सिनेमाच्या पोस्टरवर दुग्धाभिषेक करण्यात आला. लहान मुलांपासून ते वयस्कर मंडळींपर्यंत सर्वच प्रेक्षक ‘शिवरायांचा छावा’ हा सिनेमा पाहून भारावले आहेत. कुटुंब आणि मित्रमंडळींसह शिवप्रेमी आणि सिनेप्रेक्षक मोठ्या संख्येने हा सिनेमा पाहायला जात आहेत. सिनेमागृहात ‘जय जिजाऊ, जय शिवराय’ अशा घोषणाही दिल्या जात आहेत.
दिग्पाल लांजेकर म्हणतात, कोणत्याही पद्धतीचा वाद होईल…
शिवराज अष्टकाचे शिवधनुष्य पेलणारे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर म्हणाले,”माझी संपूर्ण टीम शिवकालीन सिनेमांसाठी सरावली गेली आहे, त्यामुळे हा वेग साधणं मला शक्य होत आहे. इतिहासाचा आणि फिल्म मेकिंगचा सिनेमाच्या टीमने खूप अभ्यास केला आहे. प्रेक्षकांपर्यंत हे सिनेमे पोहोचवण्यात अनेक मंडळींचा मोलाचा वाटा आहे. पण प्रत्येक सिनेमाला तरीही दीड-दोन वर्षाचा वेळ लागतो. माझ्या सिनेमात मी क्रिएटिव्ह मोह टाळतो. कोणत्याही पद्धतीचा वाद होईल अशा गोष्टी मी सिनेमात टाळतो. कोणाच्याही भावना दुखावतील अशा कलाकृतीची निर्मिती करणं टाळतो. जेव्हा मनामनात शिवराय जन्म घेतील तेव्हाच शिवजयंती साजरी होईल”.