
आमदार नितेश राणे यांची मागणी
मुंबई : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) हे दिशा सालियन हत्या प्रकरणात (Disha Salian murder case) आक्रमक झाले आहेत. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे या प्रकरणात दोषी असून त्यांच्याविरोधात लवकरात लवकर कारवाई व्हावी ही मागणी त्यांनी आधीपासूनच लावून धरली आहे. याची दखल घेत एसआयटी (SIT) स्थापन होऊन आता वेगाने तपासकार्य देखील सुरु आहे. मात्र, त्यातच नितेश राणे यांनी आता आणखी एका गोष्टीवर आक्षेप घेतला आहे. मालवणी पोलीस स्टेशनमधील काही पोलीस अधिकारी तपासाबद्दल त्यांच्या राजकीय बॉसला माहिती पुरवत आहेत, असा आरोप करत त्यांच्या हकालपट्टीची मागणी नितेश राणे यांनी पत्राद्वारे केली आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आयुक्तांना नितेश राणे यांनी पत्र लिहिले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, 'दिशा सालियन' मृत्यू प्रकरणात मालवणी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी थातुर मातुर तपास करुन बनावट क्लोझर रिपोर्ट बनवून तत्कालीन एसीपींमार्फत (ACP) प्रकरण अपघात दाखवून बंद केले होते. त्यानंतर शासनाने ते प्रकरण पुन्हा रिओपन (Re-open) करून पुढील तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. त्या एसआयटी मध्ये चुकून मालवणी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांना सामील करून घेण्यात आले आहे.
उच्च न्यायालयाने या प्रकरणात ठरवून दिलेल्या कायद्यानुसार मालवणी पोलीस स्टेशनचे आधीचे दोषी अधिकारी यांच्यावर आरोप असल्यामुळे त्या पोलीस स्टेशनचा कोणताही अधिकारी केसचा तपास करू शकत नाही. त्यामुळे चिमाजी आढाव हे एसआयटी चे सदस्य राहू शकत नाही. चिमाजी आढाव हे अपात्र असूनसुद्धा एसआयटी मध्ये सदस्य असल्यामुळे चौकशी कामात अडथळे येण्याची शक्यता आहे, असं नितेश राणे आपल्या पत्रात म्हणाले आहेत.
नितेश राणे यांनी ट्विटद्वारे दिली होती माहिती
दिशा सालियन हत्येचा भाग असलेले काही अधिकारी अजूनही मालवणी पोलीस ठाण्यात आहेत. ते तपासावरही बारीक लक्ष ठेवून आहेत आणि त्यांच्या राजकीय बॉसला माहिती देतआहेत. आम्हाला त्यांची नावे आणि त्यांनी महाविकास आघाडीच्या दरम्यान केस कशी हाताळली हे सर्व माहित आहे. निष्पक्ष तपासासाठी त्यांना काढून टाकले जावे आणि तपास करण्यात यावा याची खात्री करण्यासाठी मी एसआयटीला पत्र लिहिणार आहे, अशी मागणी नितेश राणे यांनी ट्विटद्वारे केली आहे.