बार्शी-धाराशिव मार्गावर घडला भीषण अपघात
सोलापूर : गेल्या काही दिवसांत अपघातांमध्ये (Accidents) प्रचंड वाढ झाली आहे. काल संध्याकाळच्या सुमारास बार्शी-धाराशिव मार्गावरील तांदुळवाडी येथे एसटी बस (ST Bus) आणि दुचाकीचा (Bike) भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तिन्ही मृत तरूण धाराशिव जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. हे तरुण गाडीखाली चिरडले गेल्याने त्यांचा मृत्यू झाला.
पुण्याहून धाराशिवकडे निघालेल्या एसटी बसचा आणि धाराशिवहून बार्शीकडे निघालेल्या दुचाकीचा तांदुळवाडी येथे अपघात झाला. यातील दुचाकीवर धाराशिवमधील तीन मित्र होते. एसटी बस आणि दुचाकीची झालेली धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील तीनही तरुण एसटी बस खाली अडकले. एका तरुणाचं शीर हे शरीरापासून वेगळं झालं. तर इतर दोघे जवळपास ५० फूटांपर्यंत फरफटत गेले.
कार्तिक यादव, ओंकार पवार, ओम आतकरे अशी तीन मृत तरुणांची नावं आहेत. हे तिघेही धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी होते. घटनेची माहिती मिळताच तांदुळवाडीतील ग्रामस्थ मदतीला आले. दरम्यान, बसमधील जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत.