नवी दिल्ली: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(pm narendra modi) पॅलेस्टाईनचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांच्याशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदींनी गाझाच्या अल अहली रुग्णालयात झालेल्या नागरिकांच्या मृत्यूप्रकरणी आपल्या संवेदना व्यक्त केल्या.
पंतप्रधान मोदींनी यादरम्यान स्पष्ट केले की भारत पॅलेस्टाईनच्या लोकांसाठी मानवीय मदत कायम ठेवेल. या क्षेत्रातील दहशतवाद, हिंसा आणि बिघडत चाललेल्या सुरक्षा स्थितीबाबत आपली चिंताही त्यांनी यावेळी व्यक्त केली. इस्त्रायल-पॅलेस्टाईन मुद्द्यावर भारताने दीर्घकाळापासून सुरू असलेल्या साद्धिंतीक स्थितीचा पुनरूच्चार केला.
युद्धात ३७८५ लोकांचा मृत्यू
गाझामध्ये पॅलेस्टाईनच्या नागरिकांच्या मृत्यूचा आकडा ३,७८५ वर पोहोचला आहे. गाझा आरोग्य मंत्रालयाने सांगितले की इस्त्रायलकडून युद्धाची घोषणा केल्यानंतर गाझामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या संख्या वाढून ३७८५ झाली आहे. यात १५२४ मुले, १००० महिला आणि १२० वयस्कर व्यक्तींचा समावेश आहे. याशिवाय १२,४९३ जखमी झाले आहेत. यात ३९८३ मुले आणि ३३०० महिला आहेत.
इस्त्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला १२ दिवस झाले आहेत. गेल्या १२ दिवसांत या युद्धादरम्यान अनेक अपडेट समोर आले आहेत.
इस्त्रायल दौऱ्यावर पोहोचले ऋषी सुनक
इस्त्रायल दौऱ्यावर केवळ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन गेले नाही तर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनकही इस्त्रायल दौऱ्यावर पोहोचले होते. गुरूवारी तेल अवीवला पोहोचलेले सुनक म्हणाले या कठीण काळात ब्रिटन इस्त्रायलसोबत उभा आहे. दरम्यान, इराण, जॉर्डन, लेबनानसह अनेक मुस्लिम देश इस्त्रायलच्या विरोधात विधाने करत आहेत. मात्र याच्याकडे लक्ष न देता इस्त्रायल सातत्याने गाझावर एअरस्ट्राईक करत आहे.