मुंबई/विरार : गणपतीचे आगमन (Ganeshotsav) अवघ्या दोन दिवसावर आले असताना ग्रामीण भागात आठवडी बाजारात खरेदीसाठी ग्रामस्थांची मोठी झुंबड उडाल्याचे दिसून येत आहे. गणेशाच्या देवपूजेचे सामान, निरनिराळे इतर गरजेचे सामान घेण्यासाठी शेतकरी, शेतमजूर, कामगार यांनी आठवडी बाजारात गर्दी केली होती.
यावेळी गौरी-गणपतीचे सामान, देवाची मखराची आरास करण्यासाठी गर्दी दिसून आली. सणानिमित्त घरातील लहान मुलांना नवीन कपडे खरेदी तर विरार, मांडवी, शिरसाड अशा अनेक गावात व पालघर जिल्ह्यातही सर्वत्र खरेदीची गर्दी पहायला मिळत होती. बाजारात कपड्यांची दुकाने व अनेक वस्तूंच्या दुकानांची रांग दिसून येत होती. बाजारात होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला होता.

शनिवार, रविवार व मंगळवारी येणारी सणाची सुट्टी लक्षात घेऊन शहरात काम करणाऱ्या कष्टकऱ्यांनी गावी जाण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळीच तयारी केली असून, एक आठवडा गणपतीची सुट्टी घेऊन गणपती विसर्जनानंतरच कामावर हजर होणार असल्याचे काहींनी सांगितले.

