
न्यायालयात दाखल करणार याचिका... नेमकं काय झालं?
पवई : राज्यभरात सध्या तलाठी भरती परीक्षा (Talathi Bharati Exams) सुरु आहेत. मात्र, दरवेळी या परिक्षांच्या नियोजनात काहीतरी बिघडल्याने उमेदवारांचा संताप होताना पाहायला मिळतो आहे. कधी पेपरफुटी, कधी सर्व्हर डाऊन, तर कधी केंद्रांमध्ये घोळ यामुळे उमेदवारांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. आज पवई आयटी पार्क (Powai IT park) येथील परीक्षा केंद्रावर गोंधळाचा प्रकार घडला. उमेदवारांशी संवाद साधण्यासाठी परीक्षा केंद्रावर कोणीही नसल्यानं उमेदवार संतापले आणि त्यांनी थेट परीक्षा केंद्रावरच गोंधळ घातला.
राज्यभरात तलाठी भरती परीक्षा पार पडत असताना या परीक्षेत हायटेक कॉपी प्रकरण आणि इतर गैरप्रकार समोर येत आहेत. तलाठी भरती परीक्षेचा पेपर फुटीचा आरोप असलेला मुख्य आरोपी गणेश गुसिंगे (Ganesh Gusinge) हा वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडून घेण्यात आलेल्या भरती परीक्षेत १३८ गुण प्राप्त करत पास झाला. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्यायच झाला. तलाठी भरती परीक्षेत अशा प्रकारे उघडकीस येत असलेले गैरप्रकार पाहता या सगळ्या संदर्भात तातडीनं चौकशी समिती नेमावी, या मागणीसाठी स्पर्धा परीक्षा समन्वय समिती मुंबई उच्च न्यायालयात या आठवड्यात याचिका दाखल करणार आहे.
याचिकेद्वारे काय मागण्या आणि विनंत्या केल्या जाणार?
- दहा ते पंधरा दिवसांच्या ठराविक वेळेत चौकशी समितीनं आपला अहवाल समोर ठेवावा.
- अहवाल येईपर्यंत तलाठी भरती प्रक्रिया स्थगित करावी आणि अहवाल आल्यानंतर पुढील पावलं उचलावीत.
- मेहनत, कष्ट करून अभ्यास करणाऱ्या उमेदवारांचे नुकसान होऊ नये यामुळे तातडीने ठराविक वेळेत या सर्व प्रक्रिया राबवण्याचे निर्देश न्यायालयाने द्यावेत.
- राज्य सरकारला स्पर्धा परीक्षा घेण्यासंदर्भात ज्या उपाययोजना सुचवल्या होत्या त्याची अंमलबजावणी पुढील परीक्षांमध्ये केली जावी.
- एकाच शिफ्ट मधील परीक्षेच्या पेपर फुटीचं प्रकरण समोर आलं मात्र काही शब्द पेपर फुटल्याचा संशय आहे. त्यामुळे या सगळ्या संदर्भात चौकशी समितीचं गठन न्यायालयाने करावं.