जाणून घ्या काय असणार कारवाई
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला समृद्धी महामार्ग (Samruddhi highway) वाहतुकीसाठी सुरु झाल्यापासून आतापर्यंत अनेक अपघाताच्या घटना इथे घडल्या आहे. हे अपघात टाळण्यासाठी शक्य ते प्रयत्न राज्य सरकार (State Government) करत आहे. त्यातच आता सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या तरुणांसाठी एक विशेष नियम काढण्यात आला आहे. समृद्धी महामार्गावर रील्स बनवणार्या किंवा व्हिडीओ काढणार्या व्यक्तीविरोधात शासनाने कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
समृद्धी महामार्गावर वाहन थांबवून रील्स बनवणाऱ्या किंवा व्हिडिओ शूट करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यानुसार, कलम ३४१ नुसार १ महिना कारवास किंवा ५०० रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, २८३ या कलमान्वये सार्वजनिक रस्त्यावर धोका किंवा असुविधा निर्माण होईल, असा आरोप ठेवत संबंधित वाहनचालक वा प्रवाशांवर २०० रुपये दंडासह कारावासाची दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणारे तरुण आपल्या मित्रमैत्रिणींना दाखवण्यासाठी, स्टोरी, स्टेटस ठेवण्यासाठी पर्यटनस्थळी जाऊन, धोकादायक ठिकाणी देखील उभे राहून फोटो काढतात. परंतु रिल्स बनवताना किंवा महामार्गावर इतर कुठल्याही प्रकारचे शूट करताना अडथळा होऊन मोठा अपघात होण्याची शक्यता असते. समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून या ठिकाणी प्रवाशांची वर्दळ वाढली आहे. यावेळेस रस्त्यात थांबून कोणी व्हिडीओ शूटिंग करत असेल तर ते थेट जीवावर बेतू शकते. म्हणूनच, खरबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.