
बळीराजा बसला आहे आभाळाकडे डोळे लावून...
नाशिक : राज्यभरात सगळीकडे हाहाकार माजवल्यानंतर पावसाने आता विश्रांती घेतली आहे. मात्र नाशिकमध्ये अजूनही शेतकर्यांनी लावलेल्या कांद्याच्या पिकासाठी मुबलक प्रमाणात पाऊस न पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे (Nashik Onion Crop Crisis). पावसाची वाट पाहता पाहता दोन महिने उलटले तरीही नाशिकमधील चांदवड तालुक्यात डबके तुंबेल असा पाऊस झालेला नाही. इथला बळीराजा मात्र आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दरवर्षी चांदवड तालुक्यातील शेतकरी कांद्याच्या लागवडीत व्यस्त असतात. ही लागवड ऑगस्ट मध्ये करण्यासाठी त्यांची रोपे हे जूनच्या पहिल्या आठवड्यातच टाकावी लागतात. यंदा मात्र रोपे लावायला आली तरी पावसाअभावी कांद्याची लागवड करणे अशक्य झाले आहे. दुष्काळी चांदवडचे लाल कांदा हेच मुख्य नगदी पीक असून या लाल कांद्यावरच इथले सगळे अर्थकारण अवलंबून असते. मात्र या ठिकाणी पावसाने पाठ फिरविल्याने कांदा लागवडीस अडचणी येऊन येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे.
पाऊस नसल्याने लाल कांद्याच्या लागवडीसाठी उशीर होणार आहे. अजून पंधरा ते वीस दिवस पाऊस आला नाही तर रोपेही वाया जातील अन् कांद्याचे गणित बिघडण्याची दाट शक्यता आहे. त्यातच अगोदरच पेरणी केलेली मका, बाजरी, मुग, भुईमूग यांसारखी पिके देखील पाण्याअभावी सुकायला लागली आहेत. लाल कांद्याची लागवड उशिरा होणार असल्याने उन्हाळ्यात कांद्याचे भाव वाढतील यात शंका नाही.