Friday, June 28, 2024
Homeताज्या घडामोडीMumbai rains : पाणीकपातीच्या निर्णयाबाबत मुंबईकरांना दिलासा?

Mumbai rains : पाणीकपातीच्या निर्णयाबाबत मुंबईकरांना दिलासा?

जाणून घ्या धरणांमध्ये किती टक्के पाणीसाठा वाढला…

मुंबई : मुंबईसह राज्यातील विविध भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, पालघर (Mumbai Rains) अशा भागांना तर पावसाने झोडपून काढलं. मुंबई महापालिकेने एक जुलैपासून दहा टक्के पाणी कपातीचा (Water reduction) निर्णय घेतलेला असताना धरण क्षेत्रामध्ये मागील दोन दिवसात दमदार पावसाला सुरुवात झाल्याने पाणीकपातीच्या निर्णयाबाबत मुंबईकरांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. मात्र सध्या तरी पाणी कपातीचा निर्णय लागू करण्यात आलेला आहे.

गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा (Mumbai Water Supply) करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात २४ तासात १.६८ इतकी वाढ झाली आहे. यातील सात धरणांमध्ये काल ७.२६ टक्के पाणीसाठा होता. तर २४ तासात झालेल्या मुसळधार पावसानंतर हाच पाणीसाठा आता ८.९४ टक्के झाला आहे. याचबरोबर भातसा धरणातील पाणीसाठा ५.३१ वरुन ५.६७ इतका झाला आहे, त्यामुळे मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणारी सात धरणे आणि भातसा धरणातील एकूण पाणीसाठा १४.६१ टक्क्यांवर पोहोचला आहे. म्हणजेच जवळपास २.०४ टक्क्यांनी वाढला आहे.

पुढील काही दिवसांमध्ये अशाच पद्धतीने धरण क्षेत्रात पाऊस पडल्यास जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर मुंबई महापालिका प्रशासन पाणी कपातीच्या या निर्णयासंदर्भात फेरविचार करु शकते. मात्र असे असले तरी मुंबईकरांनी पाणी जपून वापरायची गरज आहे कारण सध्या तरी या निर्णयात बदल करण्यात आलेला नाही.

मागील २४ तासांत धरणांमध्ये किती टक्के पाणीसाठा वाढला?

तुळसी आणि विहार धरणामध्ये मागील 24 तासात सर्वाधिक पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. तुळसी धरणात ७.१८ टक्के तर विहार धरणात ४.६१ टक्के इतका पाणीसाठा वाढला. यानंतर तानसा व मोडक सागर धरणात प्रत्येकी ३.११ टक्के व ३.१ टक्के इतकी पाणीसाठ्यातील वाढीची नोंद करण्यात आली आहे. मध्य वैतरणा धरणात २.६५ टक्के तर अप्पर वैतरणा धरणात मात्र पाणीसाठ्यात कोणतीही वाढ झालेली नाही.

मुंबईसह उपनगरात व ठाण्यात पावसाचा हाहाकार

मुंबईसह उपनगरात पावसाने दिवसभर हाहाकार माजवला होता. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या. रस्त्यांवर पाणी साचले होते तर नाले, गटारेही तुंबलेली पाहायला मिळाली. एवढेच नव्हे तर मुंबईत सहा ठिकाणी घरांचा काही भाग पडण्याच्या घटना घडल्या. मागील २४ तासात मुंबईतील कुलाबा येथे १४८ मिमी, सांताक्रुज येथे १२१.६ मिमी तर नवी मुंबई येथे १९६.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

दुसरीकडे ठाण्यात काल सकाळी ८:३० पासून ते आज सकाळी ८:३० पर्यंत म्हणजे गेल्या २४ तासात तब्बल २००.०८ मिमी रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी आतापर्यंत एकूण ५०६.४६ मिमी पावसाची नोंद झाली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -