मानाच्या पालख्यांचे आज स्वागत करणार संत नामदेव आणि संत मुक्ताई
पंढरपूर : आषाढी महासोहळ्यासाठी (Ashadhi Wari) राज्यभरातून संतांचे पालखी सोहळे पायी पंढरीची वाट चालत आहेत. पहिली मानाची संत मुक्ताबाईंची पालखी पंढरीत दाखल झाली आहे. तर आज बुधवारी सर्व संतांच्या पालख्या पंढरीत दाखल होणार आहेत. या सर्व पालख्यांच्या स्वागतासाठी संत मुक्ताबाईंची पालखी आणि संत नामदेव महाराज पालखी वाखरी येथे जाणार आहेत. संत मुक्ताबाई या संत ज्ञानेश्वरांच्या लहान भगिनी. पंढरीत आलेल्या सर्व संताना भेटण्यासाठी संत नामदेव महाराज आतुर असतात. आपल्या भावंडांना भेटण्यासाठी ते लवकर उठतात आणि भेटीसाठी वाखरीला येतात. सर्व संतांना पाहून ते आनंदून जातात. त्याचेच प्रतीक म्हणून नामदेवांची पालखी पंढरपूरहून वाखरीला आणण्याची प्रथा आहे.

संत नामदेवरायांचे जन्मस्थळ आणि समाधीस्थळ पंढरपूरच आहे. त्यामुळे नामदेवरायांचा पालखी सोहळा आषाढी वारीसाठी निघत नाही. पंढरपूरला येणाऱ्या सर्व संतांच्या स्वागतासाठी मात्र नामदेवरायांची पालखी वाखरीला संतांना सामोरी जाते. त्यानंतर सर्व संतांसोबत नामदेवांची पालखी पंढरपूरला येते.

संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्यासह अनेक पालखी सोहळे अखेरच्या विसाव्यासाठी वाखरी पालखीतळावर आले असून जवळपास १४ ते १५ लाखांचा वारकरी समाज याठिकाणी जमणार आहे. दोन दिवस हे वारकरी इथे असून २८ जून रोजी सायंकाळी ते पंढरपूरमध्ये प्रवेश करतील. दरम्यान वाखरी पालखी तळावर यावर्षी पहिले मोठे महाआरोग्य शिबीर ठेवण्यात आले आहे. इथे २७ आणि २८ जून असे दोन दिवस लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी होणार आहे.
